बारामतीत नैसर्गिक-सेंद्रिय शेतीवर प्रशिक्षण
बारामती – नैसर्गिक-सेंद्रिय शेती व त्यासंबंधीत योजना यांची माहिती दिली. आजच्या शेती व पीक लागवडीत खतांचा, रसायनांचा अतिरिक्त वापर होतो. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतात. नैसर्गिक शेती करणे काळाची गरज आहे. अन्नधान्यातील घटक हे विविध आजार व विकार निर्माणास कारणीभूत आहेत. येणारी पिढी निरोगी व सुदृढ व्हायची असेल, तर सकस व जीवनसत्वयुक्त आहार त्यांना दिला पाहिजे, असे मत आत्माचे प्रकल्प संचालक यांनी विजय हिरेमठ यांनी व्यक्त केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामती आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे यांच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक-सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत कृषी अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक-सेंद्रिय शेती योजनेचे राज्य समन्वयक गणेश तांबे यांनी योजनेतील आव्हाने आणि महत्वाचे टप्पे सुलभरीत्या पार पाडण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा याबद्दल मार्गदर्शन केले.
इनोरा फौंडेशनच्या संचालिका डॉ. मंजुश्री तडवळकर यांनी सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती आणि शाश्वत्त शेती यामधील फरक सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितला. विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण) डॉ. मिलिंद जोशी यांनी जैविक खते व औषध व्यवस्थापन, रसायनमुक्त उत्पादन व प्रमाणीकरण, तसेच जागतिक बाजारपेठेतील उत्पादनांची मागणी याची परिपूर्ण माहिती दिली. समारोपप्रसंगी डॉ. मिलिंद जोशी यांनी आभार मानले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांच्यासह ७ तालुक्यांतील एकूण १६६ कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नारायणगावची १० ड्रम थेअरी
नारायणगाव येथील शाश्वत फार्मिंग फौंडेशनचे संचालक सुजित पाटे यांनी १० ड्रम थेअरी याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, विविध १० प्रकारांमध्ये जैविक-नैसर्गिक कीटकनाशके, बुरशीनाशके व सूक्ष्म अन्नद्रव्ये शेतकऱ्यांना स्वतःच्या बांधावर अतिशय सुलभरित्या तयार करता येतात. त्याचा वापर करणे हे सोप्या पद्धतीने पटवून दिले.