विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर काढला मोर्चा
राजगुरूनगर – आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी खेड तालुक्यातील आदिवासी समाजाचा वतीने खेड तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चात तीन हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
पुणे-नाशिक महामार्गावरील हुतात्मा स्मृती शिल्पमधील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पणकरून अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. वाडा रस्त्याने मोर्चा खेड तहसीलदार कार्यालयाकडे रवाना झाला. वाटेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार कार्यालयापुढे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. यावेळी डॉ. संतोष सुपे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, विठ्ठल वनघरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा उमा मते, पुणे शहर बिरसा ब्रिगेड अध्यक्षा रुपाली डगळे, डॉ. दिलीप बांबळे, रोहित सुपे आदींनी मनोगत व्यक्त केले, मागण्यांचे निवेदन मोर्चातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते तहसीलदार प्रशांत बेडसे याना देण्यात आले. प्रास्ताविक लक्ष्मण मदगे यांनी केले.
आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी नको. आदिवासी आंदोलनाला पाठिंबा कायम आहे. कायदे माणसांसाठी की माणसे कायद्यासाठी अशीया देशात परिस्थिती झाली आहे. कळमोडी धरणाचे पाण्यावर स्थानिकांचा व आदिवासी भागातील नागरिकांचा हक्क आहे. कळमोडी धरणाच्या पाण्यासाठी दि. 1 नोहेंबर पासून उपोषण करणार आहोत.
– अरुण चांभारे, संचालक, जिल्हा दूध संघ
प्रमुख मागण्या
आदिवासी समाजाच्या आरक्षणातील सवलतींचा लाभ धनगर समाजाला देण्यासाठीच्या निर्णयास जाहिर विरोध, 20 पटाच्या आतील शाळा बंद करून समुह शाळा सुरु करणाऱ्या निर्णयास जाहिर विरोध, कातकरी बांधवाना घरकुल आणि घरकुलासाठी जागा देण्यास दिरंगाई करणाऱ्या सरकारचा जाहिर निषेध, खेड व चाकण परिसरामध्ये धनदांडग्यांनी बळकावलेल्या आदिवासीच्या जमिनी आदिवासीना परत मिळाल्या पाहिजेत, चासकमान, कळमोडी धरणातील आदिवासी समाजाच्या हक्काचे 30 टक्के पाणीसाठा सिंचनासाठी ठेवावे, नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण, खासगीकरण रद्द करावे, खेड तालुक्यात पेसा क्षेत्र लागू करावा.