गेल्या वर्षी 50.66 टक्के होता पाणीसाठा
लाखणगाव – पावसाचे आगार म्हणून ओळखले जाणारे भीमाशंकर अभयारण्य आणि आहुपे परिसरात पावसाने दडी मारल्याने डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरात रविवारी (दि. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत 12.81 टक्के पाणीसाठा अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.
डिंभे धरण हुतात्मा बाबू गेनू सागरात गेल्यावर्षी 16 जुलै पर्यंत 50.66 टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यावर्षी 12.81 टक्के पाणीसाठा आहे. गत वर्षी 610 मिलीमीटर तर या यावेळी अवघा 124 मिलीमीटर झाला आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.
तसेच कुकडी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पातील पाण्यावर आंबेगाव, शिरूर, जुन्नर या पुणे जिल्ह्यातील तालुक्याचा पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील शेती फुलविले जाते. धरणात होणारा पाणीसाठा हा नदीद्वारे व कालव्याद्वारे पाणी या तालुक्यांत जाते; परंतु यावर्षी डिंभे धरण परिसरात पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. आणि त्यामुळेच आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांबरोबरच सर्वच लाभक्षेत्रातील तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे धरण परीसरात मोठा पाऊस व्हावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.
यावर्षी पावसाने उघडिप दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सर्वत्रच चिंतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पाऊसच नाही. अशी परिस्थिती सर्वत्र आहे. सह्याद्री पर्वतरांगेवर मोठ्या स्वरूपात पाऊस होत असतो. त्यामाध्यमातून भीमाशंकर अभयारण्य परिसरात मोठ्या स्वरूपात पाऊस होत असतो. यावर्षी याच ठिकाणी पावसाने ओढ दिल्यामुळे या पावसाच्या पाण्यावर भरणाऱ्या धरणांमधे मात्र अत्यल्प पाणीसाठा असल्याने शेतकरी चिंतेत आहे.