माळेगाव – दिल्लीच्या अदृष्य शक्तीमुळे महाराष्ट्राची प्रगती नव्हे अधोगती झाली आहे, अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
माळेगाव पत्रकार कट्ट्यावरून सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी खासदार सुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राला पुढे नेण्याऐवजी मागे खेचत आहे.
मराठी माणूस त्यांना संपवायचा आहे. सुसंस्कृत विचाराने पुढे जाणारे पूर्वीचे भाजपचे नेते आणि आत्ताच्या भाजप नेत्यांमध्ये विरोधाभास जाणवतो.
आत्ताचे भाजपवाले यांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जनता नाकारणार आहे. दिल्लीचे अदृश हात महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करतात. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष बळी पडला. परंतु आम्ही इंडियावाले या भाजपवाल्यांविरुद्ध लढणार आणि जिंकणारही आहे, असा निर्धार सुळे यांनी केला.
बारामती लढणार आणि जिंकणार…
आपले बंधू अजित पवार हे आपल्याबरोबर नसल्याने बारामती लोकसभेची निवडणूक आव्हानात्मक आहे, असे सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघात गेली 15 वर्षे प्रामाणिक काम केले. या मतदार संघाने मला संसदेमध्ये पाठविल्यानंतर इतके चांगले काम केले, की मला त्या संसदेने अनेकदा पुरस्काराने सन्मानित केले.
आजवर मतदारसंघात प्रत्येक आमदाराला विश्वासात घेऊन आणि प्रोटोकाल धरून काम केले. त्यामुळे लोकांमध्ये माझे विश्वासाचे नाते तयार झाले आहे. या मतदारसंघातील शाळा, आरोग्य सुविधा, रस्ते, दिवाबत्तीची सुविधा, मंदिरांचा जिर्णोद्धार आदी काम मार्गी लावली आहेत. यापुढील काळात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. या कामाच्या जोरावर बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारही, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला.