गट विकास अधिकारी विजयकुमार परिट यांचे आवाहन
पळसदेव : भावी पिढीच्या हितासाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करा. भावी पिढीला शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे यासाठी आज पाणी बचत व जमिनीतील पाणी साठा वाढावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. अन्यथा भावी पिढीला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. त्या वेळी मात्र भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे भावी पिढीच्या हितासाठी नैसर्गिक संसाधनाचे जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी व्यक्त केले.
इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालय येथे जल जीवन मिशन योजना हस्तांतरण व देखभाल दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचे सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता कमिटी सदस्य, जल सुरक्षक रक्षक, महिला बचत गट प्रतिनिधी, ग्रामसंघ प्रतिनिधी यांच्यासाठी 3 दिवसांचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
या वेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परीट बोलत होते. परीट पुढे म्हणाले, सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन गावात पाणी बचतीचे विविध मार्गाचे अवलंब केला पाहिजे. गावातील नागरिकांना पाणी बचत शिकवली पाहिजे, शोष खड्डे, सामूहिक शोषखड्डे करून पाणी जमिनीत मुरवण्यासाठी व गावात स्वच्छता राहण्यासाठी जनजागृती करून मनरेगामधून लाभ घेऊन शोष खड्डे करावेत, असे आवाहनही या वेळी त्यांनी उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना केलं.
या वेळी गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक यशवंत लोणकर, रामदास पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरीचे गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, पंचायत विस्तार अधिकारी भिवा काळे, यशदाचे प्रवीण प्रशिक्षक यशवंत लोणकर, रामदास पवार, कनिष्ठ सहायक शशिकांत करडेसह तालुक्यातील विविध गावातील सरपंच, ग्रामसेवक, पाणी पुरवठा व स्वच्छता कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.