कोंढवा – महंमदवाडी, एनआयबीएम रस्ता येथे समान पाणीपुरवठा योजनेतून तीन टाक्या बांधण्यात आल्या असल्या तरी त्यामध्ये पाणी नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नाही. मात्र, या भागातील बांधकाम व्यावसायिकांनी या पाण्याच्या टाक्या ग्राहकांना दाखवून महापालिकेचे पाणी तुम्हाला थेट मिळणार आहे, असे सांगितले होते, याच रिकाम्या टाक्या पाहून लाखो रुपयांच्या सदनिका नागरिकांनी घेतल्या आहेत.
मात्र, तेच नागरिक आता प्रत्येक महिन्याला लाखो रुपये टँकरवर खर्च करत आहेत. महापालिकेच्या धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात आंदोलन करणार आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा योजनेच्या कामालाही बसला आहे. यातून कोंढवा बुद्रुक, उंड्री, महंमदवाडी येथील नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. याबाबत बाबर यांनी सांगितले की, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम २०१८ पासून सुरू आहे. हा रस्ता ८४ मीटर रुंद होणार होता तो ५० मीटर करण्याचा निर्णय घेत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. पाणीपुरवठा विभागाने काही ठिकाणी ८४ मीटर रुंदीनुसार जलवाहिनी टाकली आहे, तर आता काही ठिकाणी ५० मीटरच्या रुंदीला जलवाहिनी टाकावी लागणार असल्याने अनेक ठिकाणी जलवाहिनीचे काम वेडीवाकडे होणार आहे,
हे काम काम एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ठप्प आहे. त्याचा फटका कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, उंड्री, महंमदवाडी येथील नागरिकांना बसत आहे. सध्या जुन्या वाहिन्यांद्वारे काही अर्धा ते पाऊण तास पाणी येते, तर काही भागांत पाणीच येत नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून आहेत. आता, आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
“कोंढवा बुद्रुक, महंमदवाडी यासह इतर भागांत समान पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जाणार आहे. मात्र कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात भूसंपादनाचे अडथळे आले. आता रस्त्याची रुंदी ८४ मीटरवरून ५० मीटर केली आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामात अडथळे आले आहेत. ८ ते १० ठिकाणचे काम बाकी असून, ते पूर्ण झाल्यानंतर पुरेसे पाणी उपलब्ध होईल.” – नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग