पुणे – राज्य शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजनेस महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता नागरिकांना २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
सन १९८० ते २०२० या कालावधीत सुमारे दोन लाख ३४ हजार प्रकरणांत मुद्रांक शुल्क कमी भरल्याचे महालेखाकार कार्यालय आणि नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने केलेल्या तपासणीत समोर आले. त्यामुळे याबाबत अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने जुलै महिन्यात राज्य सरकारकडे दिला होता.
त्यानुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ अशी दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील ( १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २००४) योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात होती. त्यास शासनाने मान्यता दिली आहे.
- “अभय योजच्या पहिल्या टप्प्यात मुद्रांक शुल्क आणि दंडात मोठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यास शासनाने मान्यता दिली असून एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.”- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग