प्रशासन, राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी केवळ आश्वासनांचे गाजर
महाळुंगे इंगळे – ऑटोमोबाइल हब म्हणून जागतिक ओळख प्राप्त झालेले चाकण औद्योगिक क्षेत्र आता “खड्ड्यांचे हब’ म्हणून ओळखले जात आहे. या झालेल्या दुरवस्थेला संपूर्ण प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत राजकीय नेत्यांनी तर रस्त्यांबाबत मोठी मोठी आश्वासने देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे यावरून राजकीय नेत्यांवर प्रचंड नाराजी स्थानिक व्यक्त करत आहेत.
चाकण-तळेगाव रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. यामध्ये प्रामुख्याने शालेय विद्यार्थी स्थानिक नागरिक, विविध कंपन्यांचे पदाधिकारी, कामगार, महिला वयस्कर या सर्वांना दररोज खड्डे आणि वाहतूक कोंडी या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
चाकण-तळेगाव रस्त्यावर दररोज अपघाताचे सत्र सुरू आहे. रोज कोणीतरी आपला जीव गमावत आहे किंवा अपंग होत आहे. महाळुंगे इंगळे येथील चाकण-तळेगाव रस्त्यावरील पूल शेवटच्या घटका मोजत आहे. तो पूल केव्हाही कोसळून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून देखील प्रशासन मात्र तात्पुरती डागडुजी करत वेळ काढूपणा करत आहेत.
खासदार डॉ. कोल्हे त्यापेक्षा…
चाकण-तळेगाव रस्त्यावर केंद्र सरकारकडून एलिव्हेटेड कॉरिडोर घोषित करण्यात आला आहे यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे पाठपुरवा करीत आहेत. आहो खासदार साहेब आणि प्रशासनास आर्त हाक आहे की, आम्हाला नकोय एलिव्हेटेड कॉरिडोर रस्ता, नकोय चार पदरी आठ पदरी रस्ता, सध्या किमान खड्डे तरी बुजवा आणि वाहतूक कोंडीतून आमची मुक्तता करा, अशी मागणी स्थानिक नागरिक शासन दरबारी करत आहेत.