कर्जत -तालुक्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मांदळी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. सध्या नगर- सोलापूर महामार्गाचे काम जोरात आहे. मात्र मांदळी येथे भुयारी मार्ग नसल्याने महामार्ग ओलांडताना विद्यार्थी, भाविक नागरिक, शेतकरी यांची मोठी गैरसोय होऊन अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी भुयारी मार्ग करण्याची मागणी केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग 516 अ अंतर्गत अहमदनगर ते चापडगाव हे काम सध्या वेगाने सुरू आहे, या महामार्गावर अनेक ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे,
मात्र श्री क्षेत्र मांदळी येथे दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात, येथील शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जावे लागते, नागरिक , विद्यार्थ्यांना दररोज रस्ता पार करावा लागतो. दरम्यान, याठिकाणी भुयारी मार्ग नसल्याने अपघात वाढण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे महामार्गाला उतार असल्याने भरधाव वाहने जाताना रस्ता ओलांडणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी होत आहे.
मांदळी हे गाव तीर्थक्षेत्र असून, राज्यामधून अनेक भाविक व दिंड्या दर्शनासाठी येतात. बहुतांश लोकवस्ती व शेती रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. आष्टी तालुक्याला जोडणारा रस्ताही या गावातून आहे. त्यामुळे महामार्गावर भुयारी मार्ग होण्यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
सुधीर बचाटे, ग्रा.पं.सदस्य,मांदळी