सरकारी कार्यालये ओस : सर्वसामान्य जनतेचे हाल
लक्ष्मण गव्हाणे
कोरेगाव भीमा – महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वातावरण सुरु आहे. शिरूर लोकसभेसह पुणे आणि मावळ लोकसभेचे 13 मे रोजी मतदान असल्याने आचारसंहिता लागू आहे याच पार्श्व भूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी मात्र हाल अपेष्ठा आणि ऐन कडाक्याच्या उन्हात सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आहे.
सध्या ग्रामपंचायत पासून जिल्हाधीकारी कार्यालय पर्यंत सर्वच सरकारी कार्यालयात गेल्यांनतर साहेब निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येते. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच निवडणूक कामासाठी जुंपले असल्याचे इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणार्या सर्वसामान्य जनतेला हात हलवत माघारी परतावे लागत आहे.
सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारून कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून निवडणूक ड्युटी नसणार्या काम न करण्याची इच्छाशक्ती असणार्या काही सरकारी अधिकारी कर्मचार्यांमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे. त्यामुळेच आता 13 मे रोजी मतदान होईपर्यंत हीच परिस्थिती सुरू राहणार असून नागरिकांनी सरकारी कार्यालयांत जाण्याचे टाळले असल्याचे पाहायला मिळते.
निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पीएमआरडीए, पोलीस, शिक्षण, सहकार पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचार्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले जाते. एकंदरीत निवडणूक काम जरी महत्वाचे असले तरी सर्वसामान्य जनतेचे हाल झाले नाही पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
कचेरीत आहे सांगणारे साहेब चक्क हॉटेलात
शिरूर तालुक्यातील एका मोठ्या गावातील नागरिकाने एका सरकारी अधिकार्याला कामासाठी कॉल केला असता, साहेबांनी निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी कचेरीत असल्याचे सांगितले. संबंधित नागरिकाने काम अर्जंट असल्याचे सांगत तालुक्याला येतो काम करून द्या, अशी विनवणी केली असता अधिकार्याने या निवडणूक कामाच्या धामधुमीत वेळ नसल्याचे सांगत 13 मे ला मतदान झाल्यानंतर भेटायला सांगितले. दरम्यान हताश झालेला नागरिक ऐन उन्हाच्या तडाख्यात गावातीलच एका हॉटेल मध्ये जेवण करण्यास गेला असता संबंधित अधिकारी त्याच हॉटेलमध्ये दिसला. कचेरीत आहे असे सांगणारे साहेब चक्क हॉटेलमध्ये असल्याने नागरिकाचा पारा भलताच चढल्याचे पाहायला मिळाले.