पाटण – ज्या देशाचा नेता सक्षम असतो, तोच देश प्रगती करतो. मोदींनी देशातला भ्रष्टाचार संपवला. सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला. मोदींचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांना देशाच्या भवितव्यासाठी तिसर्यांदा निवडून देण्यासाठी याठिकाणाहून महायुतीचे उमेदवार, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना भरघोस मताधिक्याने निवडून देऊन आशीर्वाद द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महायुतीचे उमेदवार उद्यनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण येथील बाजार मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, यशराज देसाई, जयवंतराव शेलार, रविराज देसाई, नरेंद्र पाटील, भरत पाटील, विक्रमबाबा पाटणकर, कविता कचरे, मच्छिंद्र सकटे, डॉ. दिलीपराव चव्हाण, रिपांचे प्रा. रवींद्र सोनवले, सागर माने यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पद्म पुरस्कार देण्यासाठी मी केंद्राकडे मागणी करणार आहे. देसाई घराण्याच्या चार पिढ्यांवर जनतेने प्रेम केले. देसाईंच्या मागणीनुसार तालुक्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी भरघोस निधी देऊ. मोदींचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांना भरघोस निधी दिला आहे. शंभूराज देसाईंनी जी कामे मागितली, ती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शंभूराज देसाई म्हणाले, विकासाचे व्हिजन असलेल्या मोदींना पुन्हा निवडून दिले पाहिजे. त्यांच्या 400 पारच्या घोषणेमध्ये सातारचे उदयनराजे असतील. आता कमळावर मतदान करायचे व विधानसभेला धनुष्यबाणावर मतदान करायचे, असा पैरा करायचे ठरले आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यातील निवकणे, चिटेघर, बिबी धरणाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, शी मागणी त्यांनी केली. उदयनराजे भोसले म्हणाले, हा परिसर सुंदर आहे. मात्र, व्यथाही तेवढ्याच आहेत. येथील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे येथे आहेत. या भागाचे नंदनवन करायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर अॅग्रो टुरिझमसारखे प्रकल्प राबवणार आहोत. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. या सभेस महायुती घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेत्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार द्यावा
तालुक्यातील देसाई घराण्याने मोठा संघर्ष केला आहे. मला 21 वर्ष आमदारकीची वाट पाहावी लागली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पदमश्री पुरस्कार द्यावा, यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यास तात्काळ मंजुरी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी विनंती मंत्री देसाई यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.