…तर न्यायाधीश, वकिलांची सुरक्षा धोक्यात : पोलीस नावालाच
राजगुरूनगर – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी आरोपी आणणार्या पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. पोलीस वाहनाला पार्किंग आणि न्यायालयात जाण्यासाठी जागा मिळत नसल्याने अडचणीचे ठरत आहे तर आरोपीला जामिनासाठी पोलीस घेऊन येणार असल्याने त्याला भेटण्यासाठी आरोपीच्या चाहत्यांची न्यायालयात मोठी गर्दी होत आहे, यामुळे न्यायालयाच्या परिसरात भाईगिरीचे स्वरूप असून वेळीच हे थांबवले नाही तर न्यायाधीश आणि वकिलांची सुरक्षा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यासाठी राजगुरूनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाले आहे. सर्वाधिक खून, जीवे मारण्याचे प्रयत्न, चोर्या, दरोडे, बलात्कार खेड तालुक्यात होत आहेत त्यातच चाकण जागतिक कीर्तीची एमआयडीसी असल्याने चाकण, खेड पोलीस ठाण्यांतर्गत मोठी गुन्हेगारी आहे. मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांच्या टोळ्या असून पोलिसांना त्या मोडीत काढण्यात अपयश आले आहे. तर काही गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे.
पार्किंगची समस्या गंभीर
खेड न्यायालयाकडे जाणार्या रस्त्यावर न्यायालयात येणार्या वकील, पक्षकार यांची वाहने लावलेली असतात. पार्किंगची खास व्यवस्था नाही तर न्यायालयात नवीन इमारतीचे काम सुरू असल्याने तेथे पार्किंगसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच न्यायालयात जाणार्या एका बाजूच्या गेटजवळ गतिरोधक बनविल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सराईत आरोपी न्यायालयात हजर करण्यासाठी येणार असल्याने त्याच्या समर्थकांची वाहने मोठ्या संख्येने न्यायालय परिसरात अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीत अजूनच भर पडते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांची नेमणूक केली आहे पण ती फक्त न्यायालयाच्या आतमध्ये त्यामुळे न्यायालयाबाहेरच्या रस्त्यावर गाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिक प्रचंद वैतागले
राजगुरूनगर शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून कोणताही ठोस निर्णय होत नाही. रस्त्यात अस्ताव्यस्ते वाहने उभी असतात. खेड पोलीस ठाण्यात अपुरे पोलीस बळ असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची कमतरता भासते. न्यायालयात येणारी वाहने पार्किंग करण्यासाठी जागा नसल्याने ती रस्त्यात लावतात. काही खासगी पार्किंग केली आहे. तिकडे वाहने पार्किंग केली जात नाहीत. यामुळे न्यायालय रस्त्यालगत राहणार्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर वाहने घरासमोर दुकानासमोर उभी केली जात असल्याने स्थानिकांना त्यांची वाहने बाहेर काढता येत नाहीत त्यातच अनेक जण वाद घालत असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.