पिंपळे गुरव – पिंपरी चिंचवड शहरात पिंपळे निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदीला अक्षरशः जलपर्णीचा विळखा पडला आहे. जिथे जिथे पाण्यात सेंद्रिय घटक जमा होतात तिथे जलपर्णी वाढत आहे. ही जलपर्णी काढून नदी स्वच्छ करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शुद्ध वाहत्या पाण्यात, धरणाच्या पाण्यात कोणत्याही प्रकारची जलपर्णी वाढत नाही. परंतु नाल्यातील सांडपाणी व त्यातील मानवी मलमुत्रामुळे, त्याचबरोबर साबण डिटर्जंट यामुळेही पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम मोठ्या प्रमाणात वाढते. या अशा सेंद्रिय घटकांवर जलपर्णी पोसली जाते. म्हाळुंगेपासून ते पिंपळे निलख परिसरापर्यंत असे अनेक नाले आहेत. त्यातील सांडपाण्यामुळे या जलपर्णीत आणखीनच वाढ होत असून परिणामी पिंपळे निलख येथील मुळा नदीला जलपर्णीने विळखा पडला आहे.
डासांचे प्रमाण वाढले
जलपर्णीमुळे डासांच्या उत्पत्तीतही वाढ होत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांची शक्यता नाकारता येत नाही. सदर म्हाळुंगे, विशालनगर, जगताप डेअरी, कास्पटे वस्ती, वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, औंध या परिसरातही जलपर्णीमुळे डेंग्यूचे रुग्ण तसेच साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. परंतु शहरातील मूलभूत नागरी सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. जलपर्णीमुळे स्थानिकांचे व नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिंपळे निलख येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक अंतरावर मुळा नदीमध्ये जलपर्णी पसरली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. येथील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांकडे तक्रार केली आहे. दरवर्षी हे नित्याचेच होत चालले आहे.
– राजू सावळे, मनसे उपाध्यक्ष, पिं. चिं. शहर.
जलपर्णी काढण्याचे कामकाज सुरू केलेले आहे. जलपर्णी काढत असताना वरूनच म्हणजे म्हाळुंगे या परिसरातून जलपर्णी दररोज वाहून येत आहे. म्हाळुंगे या ठिकाणी कुंपण बांधलेले असताना तेथील ग्रामस्थांकडून तोडण्यात येत आहे. त्यामुळे जलपर्णी पुन्हा दुसर्या दिवशी वाढत आहे. लवकरच नदीतील संपूर्ण जलपर्णी पूर्णपणे काढण्यात येईल.
– संजय कुलकर्णी, अभियंता पर्यावरण विभाग.