घरांची छपरे उडाली ः शेतीचेही नुकसान
नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत
विजांच्या कडकडाटाने नागरिक भयभीत
अवसरी – आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, पिंपळगाव अणि अवसरी परिसरात झालेल्या मुसळधार, वादळी पावसाने अनेक शेतकऱ्याचे घराचे, गोठ्याचे, कांदाचाळीचे अणि पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून प्रशासनाने पंचनामे करावेत, अशी मागणी युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी केली आहे.
अवसरी खुर्द, तांबडेमळा, भोरवाडी, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, कामठे मळा पिंपळगाव, टाव्हरेवाडी आदी परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात जोरदार पाऊस झाला. या वादळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या घराचे छपर, स्वच्छतागृहांचे आणि गोठ्याचे पत्रे उडून गेले असून, पिकांचेही नुकसान झाले आहे.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पश्चिमेस असणाऱ्या मुधारा डोंगरावर वीज कोसळताना झालेला मोठा आवाज विद्यार्थ्याच्या मोबाइलमध्ये कैद झाला आहे. वीज कोसळताना झालेला आगीचा लोळ अणि मोठा आवाज भयावह होता. या घटनेनंतर पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर, सरपंच जगदीश अभंग यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
कामठेमळा येथील शेतकरी अनिल कामठे यांच्या राहत्या घराचे छपराची कौले उडून गेली आहे. त्यामुळे संसारोपयोगी साहित्य पावसाच्या पाण्याने भिजले आहे. या नुकसानीत अनिल कामठे याचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुक सान झाले आहे. लिंबाचा मळा येथील लहू गावडे यांच्या घराचे छप्पर उडून गेले आहे.
दत्तात्रेय बांगर आणि बाळकृष्ण बांगर यांच्या स्वच्छतागृहाची पडझड झाली आहे. मधुकर अणि बाळासाहेब बांगर यांच्या कांदा चाळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे काढणी योग्य धना, मेथी जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी पिंपळगावच्या ग्रामपंचायत सदस्या मोहिनी बांगर यांनी केली आहे.