नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बेल्हे – अणे (ता. जुन्नर) येथील बसथांबा हा कचरा डेपो बनत चालला आहे. श्री रंगदास स्वामी यांची यात्रा पुढच्या आठवड्यात सुरू होत असूनही स्थानक परिसरात स्वच्छतेची दुर्दशा दिसून येत आहे. येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला असल्याने स्थानिक रहिवासी व दुकानदारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात्रेच्या आधी हा कचरा उचलला जाईल का, असा प्रश्न येथील स्थानिक रहिवासी करत आहेत.
कल्याण- नगर महामार्ग लगत असणाऱ्या अणे बसथांब्यावर कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक, प्रवाशी व स्थानिक व्यावसायिकांना त्रासदायक ठरत आहे. अनेक दिवसांपासून येथे कचरा पडून आहे. गावचा श्री रंगदास स्वामी महाराज यात्रोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह जवळ आला असून या यात्रा उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक देव दर्शनासाठी येत असतात. यामुळे तरी हा कचरा उचलण्यास मुहूर्त मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात यात्रा असल्याने अशा वेळी गावचे बसस्थानक हे सध्या कचरा स्थानक बनत चालले असल्याने स्थानिकांची डोकेदुखी ठरत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
या कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रवाशांना स्थानकावर थांबणे मुश्किल होत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी कचरा व्यवस्थापनासाठी कोणतीही कचरा कुंडी ठेवली जात नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आहे.
अनेक दिवसांपासून स्थानक परिसरात कचरा पडून आहे. आम्हा व्यावसायिकांना या दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत आहे. आमच्या आरोग्यावर या दुर्गंधीचा परिणाम होत आहे. निदान यात्रेच्या आधी तरी ग्रामपंचायतीने येथील कचरा उचलावा.
-बाबू आहेर, हॉटेल व्यावसायिक अणे