केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दखल
बारामती – लहानपणी शाळेत नाव दाखल करूनही दारिद्रयामुळे आणि दोन लहान भावंडांचा सांभाळ करण्यासाठी लगेचच शाळा सोडून द्यावी लागल्याने निरक्षर राहिलेल्या बारामती येथील 72 वर्षीय सुशीला क्षीरसागर या नातीकडून नवभारत साक्षरता अभियानानिमित्त अक्षरे गिरवू लागल्या आहेत. मणक्याच्या आजाराने त्रस्त असतानाही शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. असाक्षर आणि त्यांना शिकवू इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायी असलेल्या त्यांच्या छायाचित्राची केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दखल घेतली आहे.
केंद्रीय सचिव संजय कुमार आणि अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी याची प्रशंसा केली. नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या “उल्लास’ या फेसबुक पेजवर हे छायाचित्र पोस्टही केले आहे. देशभरात गतवर्षापासून “नव भारत साक्षरता अभियान सर्वांसाठी शिक्षण’ या नावाने सुरू झाले आहे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात दि. 8 रोजी जागतिक साक्षरता दिनी केली. सातारा येथील 76 वर्षीय बबई मस्कर महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र आणि या दोघी आजी- नातींचे छायाचित्र यासह अनेक छायाचित्रे व माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पाठवली होती. यातील दोन्ही छायाचित्रांची दखल मंत्रालयाने घेतली आहे.
बारामती येथील सुशीला गोपीनाथ क्षीरसागर आणि त्यांची नऊ वर्षांची नात रुचिता यांचा हा फोटो प्रेरणादायी ठरत आहे. सुशीला यांचे वय 72 असून लहानपणी त्यांचे नाव त्यांच्या माहेरी (मूळगाव बोरगाव ता. बार्शी) येथील शाळेत दाखल केले. मात्र, दोन लहान भावांना सांभाळण्याची जबाबदारी आल्याने त्यांना शाळा सोडून द्यावी लागली होती. त्या निरक्षरच राहिल्या. शिक्षणाचे महत्त्व त्यांना पटले होते. त्यामुळे काबाडकष्ट करून त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करीत कुटुंबाला घराला दारिद्रयातून बाहेर काढले. शिकण्याची त्यांची अपुरी राहिलेली इच्छा आता पूर्ण होऊ शकणार आहे.
प्रेरणादायी फोटो सोशल मीडियावर
नवभारत साक्षरता योजनेमुळे त्यांच्यात शिकण्याची उमेद जागी झाली आहे. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती लक्षात घेता त्यांची नात त्यांना किमान मूलभूत शिक्षण देऊ लागली आहे. मागील ऑगस्ट महिन्यापासून त्यांना शिकवण्याचे काम त्यांची नऊ वर्षांची नात रुचिता करीत आहे. दोघीही अध्ययन- अध्यापनाचा आनंद घेत आहेत. शिकणे- शिकवण्यात मग्न असताना त्यांचा नकळत फोटो ज्योती क्षीरसागर यांनी घेतला. त्यांचा हा निरक्षरांसाठी प्रेरणादायी फोटो सोशल मीडिया व इतर माध्यमातून महाराष्ट्रात चांगलाच व्हायरल झाला आहे.