खासदार नसलो तरी प्रशासनावर पकड, आढळराव पाटील ः फुकटचे श्रेय घेऊ नका; कोल्हेंना इशारा
नारायणगाव – महाराष्ट्रातील मतदारांची प्रतारणा करून सन 2019 साली महाविकास आघाडीचे बेकायदेशीर सरकार स्थापन झाले. तेव्हापासून राजकारणाची पातळी घसरली. त्याचेच परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहे. राष्ट्रवादी पक्ष युतीच्या सरकारमध्ये सामील झाल्याने युती सरकार मजबूत राहून विकासाच्या कामाला चालना मिळणार आहे. सरकार स्थिर असल्याने मी खासदार नसलो तरी माझी प्रशासनावर पकड असून युती सरकारकडून कामे होत असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले असून बैलगाडा शर्यत व पुणे नाशिक महामार्गाच्या कामांना माझ्या काळात मंजुरी मिळाली आहे. भाषणात बोलले म्हणजे बैलगाडा शर्यत चालू झाली, असे होत नाही तर त्यासाठी मैदानात उतरावे लागते, आंदोलने करावी लागतात. आजही माझ्यावर बैलगाडा शर्यतीच्या अनेक केसेस आहे.
मला 2017, 2018 साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक महामार्गाच्या कामास मंजुरी देऊन लवकरच टेंडर काढले जाईल असे सांगितले होते. त्याचे लोकसभेत रेकॉर्ड आहे. पुणे नाशिक रेल्वेसाठी मी 18 वर्षे पाठपुरावा केला आहे. परंतु 2019 मध्ये माझ्याविरुद्ध प्रचार करताना याबाबतीत खिल्ली उडवली होती.
राजीनामा लोकसभा अध्यक्षांना द्यायचा
खासदारकीचा राजीनामा द्यायचाच होता तर तो लोकसभा अध्यक्षांना का नाही दिला? असा प्रश्न आढळराव पाटील यांनी केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून निवडणुकीसाठी डॉ. कोल्हे कुठूनही उभे राहीले तरी मी त्यांच्या विरोधात उभा राहणार असल्याचे आढळराव यांनी असे स्पष्ट केले.
तुम्ही जी दारे ठोठावताय, त्याची किल्ली माझ्याकडे
खासदार डॉ. कोल्हे यांचे आढळराव यांच्या टीकेला उत्तर
नारायणगाव – शिरूरचे माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत; मात्र आढळराव पाटील जरी दार ठोठावत असले तरी त्या दाराच्या किल्ल्या माझ्याकउे आहेत, असा दावा शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
“जबाब मिलेगा, करारा जबाब!’ असं म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.याबाबत त्यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात डॉ. कोल्हे म्हणतात की, अमेरिकेत माझी कंपनी नाही त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवून लोकसभेत पाठविले होते त्याचा गैरफायदा घेऊन केवळ संरक्षण विषयक प्रश्न विचारून मी माझ्या कंपनीचे उखळ पांढरे करून घेतले नाही.
अभिनय माझ्या चरितार्थाचे साधन असून तो माझा छंद आहे. आपण मतदारसंघातील सर्व कामांचे श्रेय आपणाकडे घेण्याचा प्रयत्न करता मग पंधरा वर्षात ती कामे पूर्ण का झाले नाहीत? महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती घडत आहे, त्याचा आपण निषेध करणे गरजेचे असतानाही घडणाऱ्या घटनात आपणास संधीसाधूपणा दिसतो आहे.
तुम्ही सोडले, मी साथ दिली
शिवसेनेत (उद्धव ठाकरे गट) असताना 2004,2009,2014 व 2019 मध्ये शिवसेनेने आपणास लोकसभेचे तिकीट दिले होते. तरीसुद्धा त्यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांची साथ सोडून स्वार्थासाठी निघून गेलात; परंतु 2019 साली मला लोकसभेच्या निवडणुकीचे तिकीट ज्या शरद पवारांनी दिले होते. आज त्यांच्या अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्यासोबत उभा आहे, हा आपल्या दोघांमध्ये मूलभूत फरक असल्याची जाणीव डॉ. कोल्हे यांनी करून दिली.
तुम्हाला उमेदवारी तर जाहीर होऊद्या
लोकसभेची उमेदवारी तर जाहीर होऊ द्या. शिरूर लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीने दावा ठोकला आहे. आपल्याला उमेदवारी दिली तर आपणास साथ देणारे आमदार निवडून येत नाही हे भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांना माहित आहे. त्यामुळे माझ्याविरूद्ध लढण्यासाठी आपल्याला उमेदवारी तर जाहीर होऊद्या असे सडेतोड उत्तर देताना डॉ. कोल्हे यांनी दिले आहे.