पुणे – उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांची नगरपरिषद करण्याबाबत शासनाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दोन्ही गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून स्वतंत्र पाणी योजना करण्यात येत असून, ती पूर्ण झाल्यानंतर या योजनेचे परिचलन तसेच दुरुस्तीचा आर्थिक भार महापालिकेवर देऊ नये, असा अभिप्राय महापालिका प्रशासनाकडून नगरविकास विभागास पाठविण्यात आला आहे.
या दोन्ही गावांची नगरपरिषद होणार असली तरी महापालिकेचा कचरा या गावाच्या हद्दीत असलेल्या डेपोमध्ये येत असल्याने महापालिकेने या पाणी योजनेचे परिचलन तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यावर शासनाने महापालिकेकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. सध्या या दोन्ही गावांना महापालिकेकडून दररोज 200 टॅंकर फेऱ्याद्वारे पाणी दिले जात आहे. मात्र, या गावांची पाणी योजना सुरू होताच पालिकेकडून या दोन्ही गावांचे टॅंकर बंद केले जाणार आहेत.
योजनेसाठी पालिकेचा निधी
ही दोन्ही गावे महापालिकेच्या कचरा डेपोने बाधित असल्याने 2017 मध्ये महापालिका हद्दीत ही गावे समाविष्ट होण्याच्या आधीपासून या गावांना पालिकेकडून टॅंकरने पाणी दिले जात आहे. तर गावांच्या समावेशानंतरही टॅंकरद्वारेच पाणी दिले जात आहे. दोन्ही गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे सुमारे 33 एमएलडी क्षमतेची पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा खर्चही महापालिकेने उचलला असून, यात जलवाहिन्या तसेच पाण्याच्या टाक्यांची कामे केली जात आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत महापालिकेने 31 कोटींचा निधी दिला आहे.
कचऱ्याबाबत भूमिका ठरेना
या दोन्ही गावांची नगरपरिषद झाली तरी या गावांचा कचरा महापालिकेच्या उरुळी देवाची येथील डेपोत टाकण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने त्याबाबत अद्याप आपला अभिप्राय दिलेला नाही. ही दोन्ही गावे कचरा डेपो बाधित आहेत. त्यामुळे गावांना महापालिका सुविधा देते. मात्र गावांचा कचरा घेतल्यास त्याची वाहतूक तसेच प्रक्रियेचा भार महापालिकेस उचलावा लागणार असल्याने महापालिकेकडून त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.