पुणे – पावसाच्या सरी अंगावर घेत चिंब चिंब भिजत निसर्गाचा आनंद लुटणं हा अनेकांचा छंद. या छांदिष्टांना आषाढसरी खुणावू लागल्या असून, त्यांची पावले पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. या पर्यटकांना धुंद पावसात बेधुंद न होता, पर्यटनाचा निर्धोक आनंद लुटता यावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि वनविभागही सज्ज झाला असून, पर्यटनावर विरजन नको म्हणून धोक्याच्या ठिकाणी पर्यटकांना मज्जाव करण्यात येत आहे. या दोन्ही विभागाकडून पर्यटकांवर “वॉच’ ठेवण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यात धरणांचे जाळे आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख नद्या असून, त्यावर पंचवीस धरणे आहेत. शहरातील मुठा-मुळा या प्रमुख नद्यांबरोबरच घोड, भीमा आणि नीरा या नद्यांवर ही धरणे आहेत. याबरोबरच जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य स्थळं आहेत. जिल्ह्यातील माळशेज, लोणावळा, भाजे, कार्ले तसेच शेजारील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कोयना धरण आदी निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. यंदा मान्सूनला उशीर झाला. मात्र, घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी धबधबे, पाणथळ ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
पावसामुळे रस्ते, घाट, पायवाटा निसरड्या झालेल्या असतात. दरड कोसळण्याच्यी शक्यता असते. अतिवृष्टी होण्याची शक्यता असते, असे असताना हौसी आणि हुल्लडबाज पर्यटकांकडून गैरवर्तन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याचे प्रकार घडले असून, यंत्रणेवर त्याचा देखील ताण येत आहे. पर्यटन महामंडळाने माळशेज, कोयना धरण, सिंहगड, पानशेत आदी ठिकाणी वन विभागाच्या साहाय्याने धोकादायक ठिकाणे निश्चित करून या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी कठडे उभारले आहेत, सेल्फी पॉइंट किंवा छायाचित्र काढण्यासाठी गर्दी असणाऱ्या धोकादायक ठिकाणी देखील पर्यटकांना मज्जाव करण्यात येत आहे.
पावसाळ्यात पर्यटकांची विशेष करून माळशेज घाटाला पसंती असते. या ठिकाणच्या निवासस्थानाबरोबरच कोयनानगर, महाबळेश्वर आणि कार्ला येथील पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी खबरदारी म्हणून धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी सतर्क राहण्याबाबतचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच संबंधित ठिकाणी पर्यटकांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. तसेच सेल्फी पॉइंट काढून टाकण्यात आले आहेत, लोखंडी जाळ्या-कठडे बसविण्यात आले आहेत.