नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात जिवलग मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेडकीमधील दोन 16 वर्षीय मुली बोरपाडा धरणात आंघोळीला गेलेल्या असताना ही घटना घडली. आजूबाजूला मदतीला कोणीही नसल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील बेडकी येथील उज्वला गावित आणि मिखा सानु गावित या दोन्ही मैत्रिणी धरणाच्या किनारी आंघोळीला गेल्या होत्या. यावेळी धरणाच्या किनारी दगडावर बसुन आंघोळ करत असताना दोघींचा पाय घसरला आणि त्या पाण्यात पडल्या. त्यावेळी आजूबाजूला परिसरात कोणीही नसल्याने त्यांना वेळेलावर मदत मिळू शकली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व मुलींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दोन्ही मुलींचे मृतदेह धरणाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले आहेत. घटनास्थळी विसरवाडी पोलिस दाखल झाल्यानंतर पंचनामा करून मृतदेह विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृत मिखा गावितच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. तर मृत उज्वला गावितच्या पश्चात आई वडील चार बहिणी असा परिवार आहे. घटनेत दोन्ही जिवलग मत्रिणींच्या दुर्दैवी मृत्यूमुळे बेडकी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.