नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीज्ज्ञ प्रशांत किशोर या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचा विजय होईल असा दावा करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपला २०१९ मध्ये जेवढ्या जागा मिळाल्या त्याच्याच जवळपास जागाही आता मिळतील. तसेच नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असेही म्हटले आहे. मात्र त्यांच्या या भाकितावर अन्य तज्ज्ञांनी असहमती दर्शवली आहे. राजकीय पक्षांनीही प्रशांत किशोर यांचा हा दावा फेटाळला आहे. त्यानंतर किशोर यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिले आहे.
टीकाकारांच्या संदर्भात खोचक टिप्पणी करताना ते म्हणाले की पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. कारण त्यामुळे डोके आणि शरीरही हायड्रेटेड राहते. जे लोक निवडणुकीच्या संदर्भातील माझ्या अंदाजामुळे चकित आहेत त्यांनी ४ जून रोजी ( निवडणूक निकालाच्या दिवशी) भरपूर पाणी आपल्या जवळ ठेवावे. २ मे २०२१ रोजी प. बंगालमध्ये काय झाले त्याचेही त्यांनी स्मरण करावे.
२०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत किशोर यांच्या संस्थेने तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचार अभियानाचे काम पाहिले होते. त्यावेळीही ते म्हणाले होते की बंगालच्या निवडणुकीचे निकाल सगळ्यांनाच चकित करणारे असतील आणि भारतीय जनता पार्टीला शंभरच्या आतच जागा मिळतील. मात्र त्यावेळी अन्य तज्ज्ञ आणि माध्यमे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळेल असा दावा करत होते. स्वत: भाजपही छातीठोकपणे विजयाचा दावा करत होती.
दरम्यान, आता प्रशांत किशोर यांनी जो दावा केला आहे तो योगेंद्र यादव यांनी खोडून काढला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपला गेल्या वेळेपेक्षा ५० जागा कमी मिळतील. तसेच आपल्याला या क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.