स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक : थकित व्याजासह अधिकचे 300 रुपये द्या
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या उसाची थकीत एफआरपी अधिक तीनशे रुपये ऊस उत्पादक सभासदांना अदा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भवानीनगर येथील साखर कारखान्यावर आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी व शेतकऱ्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथील असलेल्या व्यापार पेठमधून घोषणा देत फेरी काढून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्वरित थकीत एफआरपी अधिक व्याज व संघटनेने 21व्या ऊस परिषदेमध्ये एफआरपी अधिक 300 रुपये असे मागितले आहेत. त्याप्रमाणे ऊस उत्पादक सभासदांना ही रक्कम छत्रपती सहकारी साखर कारखान्याने अदा करावेत यासाठी कारखान्यावर व्यापार पेठ मधून फेरी काढून आंदोलन करण्यात आले.
अमरसिंह कदम म्हणाले की, राज्यामध्ये ज्या ज्या सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक सभासदांच्या उसाची एफआरपी, प्रमाणे होणारे रक्कम अद्यापपर्यंत अदा केलेली नाही अशा कारखान्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेले आहेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू होऊन देखील अद्यापपर्यंत एकही चांगल्या प्रकारचा मोठा पाऊस झालेला नाही हे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे.
मुलांचे शिक्षण, प्रपंच, यासाठी शेतकऱ्यांना उसाच्या पैशाशिवाय पर्याय उरलेला नसल्याने श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने थकीत एफआरपी रक्कम व अधिक 300 रुपये असे ऊस उत्पादक सभासदांना त्वरित अदा करावेत याबाबत भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
जोपर्यंत आमच्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाची थकीत एफआरपी व अधिक तीनशे रुपये देण्यात येत नाहीत तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाला स्वस्त बसू देणार नाही. अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमरसिंह कदम व त्यांचे सर्व सहकारी व शेतकऱ्यांनी घेतली आहे.
15 दिवसांत रक्कम अदा करण्याचे आश्वासन
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2022 – 23 मध्ये गळीत झालेल्या उसाची 95.43 टक्के एफआरपीची रक्कम अदा केलेली आहे. उर्वरित 4.57 टक्के एफआरपीची रक्कम व त्यावरील व्याज 15 दिवसांत ऊस पुरवठादार सभासद यांना अदा करण्यात येईल, असे साखर कारखान्याने निवेदनाद्वारे सांगण्यात आल्याने उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन थांबवले; परंतु पंधरा दिवसात ऊस उत्पादक सभासदांना एफआरपी रक्कम व त्यावरील व्याज देण्यात आले नाही तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल, अशा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.