पुणे – खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा सुमारे 50 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, धरणसाखळीत शुक्रवारी दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो.
यंदा पावसाने काहीशी ओढ दिल्याने धरणांनी तळ गाठला होता. मात्र मागील काही दिवसांपासून या चारही धरणांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाणी जमा होऊ लागले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. दरम्यान खडकवासला धरणात 1.19 टीएमसी (60.26 टक्के), पानशेत धरणात 5.34 टीएमसी (50.14), वरसगाव-6.12 टीएमसी (47.73), टेमघर धरणात 1.16 टीएमसी म्हणजे पाणीसाठा झाला आहे.
शहरात हलक्या सरी
शहरात सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडवली. शुक्रवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात 4 मिमी पावसाची नोंद झाली. मागील 24 तासांत शहरासह उपनगरातील पावसाचा जोर कमी झाला होता. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. अधून-मधून रिमझिम होती. मात्र, पाचनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये पावसाची जोरदार सर आली.