रांजणी -राज्यात चालू हंगामात फळबाग लागवड केल्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांना लवकरच 21 कोटीपेक्षा जास्त रकमेचे वाटप होईल, अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली. कृषी खात्याने यंदा राज्यभर किमान 60 हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटपाची तयारी केली होती; परंतु अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असल्यामुळे शेतकर्यांना नव्या बागा लावण्यात आखडता हात घ्यावा लागला.
परिणामी यंदा नवीन लागवड चाळीस हजार हेक्टरच्या पुढे गेलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 हजार हेक्टरने लागवड घटली आहे. अर्थात लागवड केलेल्या शेतकर्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. कृषी आयुक्तालयाने अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे केली होती. अलीकडेच 20 कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आधीचा शिल्लक निधी आणि नव्याने मिळालेला निधी यातून थकीत अनुदानाचा पहिला टप्पा जमा केला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
फळबागेसाठी केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान वाटले जाते; परंतु बहुभूधारक तसेच जॉबकार्ड नसलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरवले जात नाही. अशा शेतकर्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान वाटले जाते; परंतु राजकीय कुरघोड्यामध्ये फुंडकर योजनेला गेल्या चार वर्षात पुरेसा निधी मिळाला नव्हता. 2023 – 24 मध्ये या योजनेला चांगले दिवस आले आहेत.
या योजनेतून किमान 104 कोटी रुपयांच्या अनुदान वाटण्यास प्रशासकीय मंजुरी देखील मिळालेली आहे. आता अनुदान भरपूर असले तरी लागवड त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येते. भाऊसाहेब फुंडकर योजनेतून राज्याच्या सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकर्यांना वीस कोटी रुपये तर अनुसूचित जाती प्रवर्गातील फळधारकांना चाळीस लाखांचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. शेतकर्यांच्या बँक खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाईल, असे फलोत्पादन विभागातून सांगण्यात आले.
“राज्यात फळबाग लागवडीचा कालावधी आता संपुष्टात आल्यामुळे मार्च अखेरपर्यंत अजून नव्या बागा उभ्या राहण्याची शक्यता नाही; परंतु आधीच्या फळबागांची लागवड आणि मशागत केलेल्या सर्व शेतकर्यांना अनुदान वाटण्यात कोणतीही अडचण येणार नाही.” -डॉ. कैलास मोते, कृषी संचालकफलोत्पादन विभाग