खडकवासला(प्रतिनिधी) : वेल्हे तालुक्याच्या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या गावाचे नाव चुकविले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांचे ‘वांजळे’ हे गाव. दिनकर धरपाळे हे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असून त्यांच्याच गावाचे नाव चुकविले असल्याने दुर्गम भागातील गावांची नावे असलेले नामफलक पुन्हा तपासण्याची गरज आहे.
वेल्हे हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून राज्यातील व राज्याबाहेरील अनेक पर्यटक वेल्ह्यात येण्यासाठी वेल्हे-नसरापूर या मुख्य मार्गाचाच वापर करीत असतात. या मुख्य मार्गावरील हे नामफलक पूर्णतः चुकीचे असल्याने अनेक पर्यटकांना गुगल मॅपच्या साहाय्याने पर्यटनस्थळी पोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
दापोडे व वांजळे येथील चौकात लावलेल्या नामफलकावर ‘नसरापूर’ या गावाच्या नावात ‘पूर’ लिहिताना दुसऱ्या उकाराऐवजी पहिला उकार देत ‘नसरापुर’ असा लिहिण्यात आला असल्याने नामफलक तयार करताना शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते तसेच वेल्हे पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर यांचे गाव ‘दापोडे’ असे असून त्याचेही नाव ‘दापडे’ असा उल्लेख करण्यात आला होता. ते नाव दुरुस्त करण्यासाठी वारंवार मागणी होत असल्याने त्याला काना मात्र्याचे केवळ ‘ठिगळ’ लावल्याचे दिसून येते मात्र त्याच फलकावरील ‘वांजळे’ या गावाचे नाव पूर्णतः चुकीच्या पद्धतीने ‘वांझरे’ असा लिहिण्यात आला आहे.
यासंबंधी वेल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय संकपाळ यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,”संबंधित ठेकदाराशी संपर्क साधून तालुक्यात जेथे जेथे चुकीची फलके लागली आहेत ते सर्व दुरुस्त करून घेण्याबाबत आदेश देण्यात येईल.”
दरम्यान, वेल्हे तालुक्यात सुरु असलेले अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारींचे निवेदन घेऊन वेल्ह्याचे माजी शिवसेनाप्रमुख दत्तात्रय देशमाने व उपतालुकाप्रमुख सुशांत भोसले वेल्ह्याच्या कार्यालयात पोचले असता अधिकारी पुण्याला असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयात असलेले कर्मचारी हे गुंडगिरीच्या भाषेत आलेल्या तक्रारदारांशी बोलत असल्याचा अनुभव घेतला.
बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात सोमवार व शुक्रवार या बाजाराच्या दिवशीही उपस्थित नसल्याने नागरिकांनी समस्या घेऊन कार्यालयात कधी यावे? असा सवाल देशमाने यांनी केला.