बेंगळुरू – सुमार कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेल्या अजिंक्य रहाणेचे नशीब पालटल्याचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात दिसून आले. ज्याचे नेतृत्वच काय, पण त्याचे संघातील स्थानही नको अशी स्थिती झालेल्या रहाणेला यंदाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) खरेदी केले. इतकेच नव्हे तर त्याच्याकडेच संघाचे नेतृत्वही सोपवले जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआय, निवड समिती व टीकाकार यांना चांगलाच पलटवार बसला आहे.
जान्हवी मेहताच्या केकेआरने दुसऱ्या दिवशी झालेल्या लिलावात रहाणेला बेस प्राइस 1 कोटीलाच खरेदी केले. त्याच्यासाठी दुसऱ्या कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तसेही त्याचे भारतीय कसोटी संघातील स्थान गेल्यात जमा असलेल्या रहाणेसाठी वाढीव बोली लावण्यातही कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.
रहाणे हा अनुभवी खेळाडू आहे. तसेच तो सलामीला येत एक महत्त्वाची खेळी करू शकतो. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्वदेखील केले आहे. त्याचा फायदा केकेआरला होईल, असे मत जान्हवीने व्यक्त केले आहे.
केकेआरने यंदा आंद्रे रसेल, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्तीला रिटेन केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कर्णधार म्हणून कोणताही बडा भारतीय खेळाडू नव्हता. आता रहाणेच्या समावेशाने त्यांना विजयी सातत्य राखणारा कर्णधार मिळाला आहे.
रहाणेने जर यंदाच्या मोसमात आपले नेतृत्व पुन्हा एकदा यशस्वी सिद्ध केले, तर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते. रहाणे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यावरून चर्चेत होता. त्याने ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका विजयाचे श्रेय दुसऱ्यानेच लाटल्याचे वक्तव्य केले होते. याचबरोबर त्याने एकदिवसीय सामन्यांच्या संघातील स्थानही धोक्यात आल्यामुळे त्याची मानसिकताही खालावली होती. मात्र, आता आयपीएल स्पर्धेत खेळता येणार असल्याने येत्या काळात तो भारतीय संघात पुनरागमन करणार का, याची चर्चा सुरू होणार आहे.