पुणे – शहरात शुक्रवारी झालेल्या पावसाने शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. तर मध्यवर्ती पेठांची अवस्था तर त्यपेक्षाही बिकट होती. त्यामुळे मागील वर्षे केवळ निविदांमध्ये रस असलेल्या भाजपचे पितळ उघडे पडले असून पावसाळयात आपल्या कामांची पोलखोल होणार हे लक्षात आल्याचे भाजपच्या कसबा विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन करत आपल्या अपयशाची कबूली दिली असल्याची टिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी केली आहे.
ज्या भागात भाजपचे शहराचे खासदार,आमदार, महापालिका पदाधिकारी तसेच सर्वाधिक नगरसेवक आहेत.त्याच कसबा पेठ, शुक्रवार पेठ, मंगळवारपेठ, नारायणपेठ परिसरात पावसाने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. त्यावरून या भागात किती दर्जाची कामे झाली आहेत हे अधोरेखित झाले असल्याची उपरोधीक टिकाही देशमुख यांनी केली आहे.
तर आता ज्या भाजप नगरसेवकांनी ड्रेणेज, पाणी पुरवठा, कॉंक्रीटीकरणाच्या कामे करताना मोठ मोठे फलक लावले होते त्यांनी आता या भागात आलेल्या पूराला आपणच जबाबदार आहोत याचे फलक लावण्याचे सौजन्य दाखवावे आपल्या चूकांचे खापर महापालिकेवर फोडू नये अशी टिकाही देशमुख यांनी केली आहे.