मुंबई : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या राज्यसभा निवडणुकीत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेलं राजकीय चातुर्य चर्चेचा विषय ठरला आहे. फडणवीसांवर सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील फडणवीसांचे कौतुक केलं. मात्र हा एकप्रकारे महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे.
सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा निवडणुकीतील पराभव मान्य करत भाजपचं अभिनंदन केलं. त्या म्हणाल्या, शेवटी निवडणूक आहे. यात आपण कधी जिंकतो, तर कधी पराभूत होतो. भारतीय जनता पार्टीला शुभेच्छा. शरद पवार म्हणालेत की आम्ही रिस्क घेतली होती, परंतु त्यात यशस्वी झालो नाही. महाविकास आघाडीची मते अखंड राहिली. जेव्हा आमचे सरकार आले तेव्हा जे अपक्ष आमच्यासोबत होते ते जागेवरच आहेत.
यावेळी त्यांनी शरद पवारांना अमिताभ बच्चन यांची उपमा दिली. त्या म्हणाल्या, आमच्याकडे संख्याबळ नसतानाही आम्ही प्रयत्न केला. कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो,” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.
दरम्यान संजय शिंदे यांच मत राष्ट्रवादीला गरज असताना मिळालं नाही, यासंदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र या निवडणुकीत ईडीचा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर झाला का हे सांगण्याची गरज नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.