पुणे – आळंदी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पुणे जिल्ह्यासाठी (शुक्रवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. पण, याबाबत महापालिका शाळांना सुट्टीचा निरोप दिलाच नाही. तसेच शिक्षकांनीही पालकांना काहीच कळवले नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये सकाळी गोंधळ उडाला. अनेक मुले तसेच शिक्षकही शाळेत पोहचले. मात्र, सुट्टी असल्याचे लक्षात आल्यानंतर लगेच शाळा सोडण्यात आल्या.
तर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अधिकार्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना काहीच सांगता आले नाही. मात्र, या गोंधळामुळे शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मनपा शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटूंबातील मुले आहेत, त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवून कामावर निघून जातता. त्यानंतर घरी कोणीच नसते. अनेक पालक अनुदानातून मुलांना रिक्षा अथवा स्कूलबसने शाळेत पाठवतात.
त्यानुसार, हे शालेय वाहतूक करणारे मुलांना शाळेत सोडून जातात आणि शाळा सुटण्याच्या वेळेत घ्यायला येतात. मात्र, शुक्रवाच्या सुटीबाबत माहितीच पालकांना नसल्याने पालकांनी मुलांंना नियमित शाळेत पाठविले. त्यानंतर काही शाळा सुरू होत्या तर काही बंद त्यामुळे मुलांचा गोंधळ उडाला. परिणामी सुरक्षा रक्षक तसेच काही शिक्षकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पालकांना संपर्क करून मुलांना घरी पाठवून दिले. काही पालक काम सोडून परत आले. तर अनेक मुले एकटीच घरी परत गेली.