पुणे –विविध कारणांमुळे पुढे ढकललेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी (एनटीएस) अखेर तब्बल पाच महिन्यांनी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. “एनटीएस’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमित आणि विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.
“एनसीईआरटी’च्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्य स्तरावरील परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते. या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देता येते. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यंदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची राज्यस्तर 16 जानेवारीला, तर राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा 12 जूनला घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रिया राज्य परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा नियमित शुल्कासह 22 एप्रिलपर्यंत आणि विलंब शुल्कासह 26 एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. परीक्षेची तारीख “एनसीईआरटी’कडून प्राप्त झाल्यावर संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या प्रक्रियेचे काम राज्य परीक्षा परिषदेतर्फे खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने तांत्रिक कारणास्तव न्यायालयात याचिका दाखल केल्याने नोंदणी थांबवण्यात आली. तसेच “एनसीईआरटी’ने 16 जानेवारीला होणारी परीक्षा पुढे ढकलली. काही विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे राहिले असल्याने पालक विद्यार्थ्यांकडून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी पुन्हा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले.