नगर -जिल्ह्यात सध्या ऊस गाळप जोरात सुरू असून सर्व ऊसाचे गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यात आजमितीस 1 कोटी 63 लाख 61 हजार 812 मेट्रीक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले असून त्याद्वारे 1 कोटी 63 लाख 65 हजार 740 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यावेळी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दहा टक्के राहिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात शिल्लक उसाचा प्रश्नही उभा राहिला आहे. अजूनही जवळपास 20 ते 22 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप बाकी आहे.
जोपर्यंत कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक आहे तोपर्यंत कारखाने सुरू ठेवावेत अशा सूचना आहेत. जिल्ह्यात जवळपास 23 कारखाने आहेत. या कारखान्यांद्वारे गाळप सुरू आहे. दोन कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे या कारखान्यांनी त्यांच्याकडील आवश्यक साहित्य दुसऱ्या कारखान्यांना द्यावे असे म्हटले आहे. ऊस गाळपात जिल्ह्यातील कारखान्यांनी आघाडी घेतली असली तरी अजूनही बराच ऊस शिल्लक राहिला आहे. सध्या एप्रिल महिना सुरू आहे. पुढील गाळप हंगामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे हा शिल्लक ऊस गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांसमोर आहे.
दररोज साधारण 1 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप क्षमता आहे. सध्या 70 ते 75 हजार मेट्रीक टन या प्रमाणात गाळप होत आहे. या काळात कारखान्यांना मजुरांची टंचाई जाणवत आहे.
दोन जिल्ह्यांत गाळप जोरात..
दरम्यान, नगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यातील कारखान्यांनी 18 एप्रिलपर्यंत जवळपास 1 कोटी 77 लाख 57 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. याद्वारे 1 कोटी 77 लाख 99 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा 10.02 टक्के इतका राहिला आहे.