पुणे : लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यात भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांच्या नावांची घोषणा करत निवडणुकांचे रणशिंग फुंंकले असले, तरी पुण्यातील निवडणुका लोकसभेच्या चौथ्या टप्पात होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते सुस्तावले आहेत.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी अद्याप कोणताही जाहीर प्रचार सुरू केलेला नाही. केवळ भेटीगाठी आणि शहर पातळीवरील पदाधिऱ्यांच्या बैठका सुरू असल्याने कार्यकर्ते मात्र सुस्तावलेल्या स्थितीत दिसत आहेत. अनेक कार्यकर्ते उन्हाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.
देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दोन आठवड्यांचा अवधी उलटला आहे. या निवडणुका सात टप्प्यांत होणार असून, महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे.
परिणामी उमेदवारांना जवळपास ५४ दिवसांचा कालावधी मिळाला असून, प्रत्यक्षात पुण्यातील निवडणूक प्रक्रीया १८ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कालावधीत प्रचार कसा करायचा, असा प्रश्न उमेदवारांनाही पडला असून, त्याचे नियोजनच होत नसल्याने कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. त्यातच कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयाचा आसरा असला, तरी तिथेही केवळ बैठकांपुरतेच थांबता येत असल्याने कार्यकर्ते प्रचाराच्या नियोजनाच्या प्रतीक्षेत आहेत.
उमेदवारांचा भेटीगाठींवर भर
पुण्याची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर असल्याने भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे. त्यात आजी, माजी आमदार, पक्षाचे माजी नगरसेवक, जुने सहकारी, तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या भेटींमधून मतदारांचा अंदाज, तसेच पुणेकरांचा कलही जाणून घेण्यावर दोन्ही उमेदवारांकडून भर दिला जात आहे.
नेत्यांचा वेळ नाराजी दूर करण्यात
एकीकडे उमेदवारी जाहीर झालेली असली तरी पक्षाकडून अद्याप कोणतेही प्रचाराचे नियोजन उमेदवारांंना देण्यात आलेले नाही. जस जसे निवडणूकांचे टप्पे येत जातील तस तसे नेत्यांची शहरात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे, काॅग्रेस आणि भाजपचे कोणतेही मोठे नेते पुण्यात फिरकलेले नाहीत तर जे नेते येत आहेत ते पक्षातील नाराजांची समजूत काढण्यासाठी येऊन निघून जात आहेत. त्यामुळे, पुण्यातही नेत्यांची वर्दळ १५ एप्रिल नंतरच वाढण्याची चिन्हे आहेत.