अरुणकुमार मोटे
सविंदणे – शिरूर लोकसभा निवडणुकीत महायुतीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. शरद पवार गटाकडून विद्यमान डॉ. अमोल कोल्हे हे मैदानात उतरले आहे. कागदावरची बेरीज आढळरावांसाठी जमेची बाजू असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडून शिरूर लोकसभेतील डागडुजी सुरू झाली आहे. या बेरजेच्या राजकारणात कोणतीही उणीव राहू नये, याची पुरेपूर दक्षता घेतली जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार, असे दोन गट पडले आहेत. सत्तेच्या सारीपाटावर अजित पवार हे स्थानापन्न झाले. यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील मातब्बर नेते, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवारांच्या गोटात सामील झाले. वळसे पाटील यांची भूमिका ही शरद पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होती.
राजकारणाचे बाळकडू गिरवलेले सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या मतदारसंघात शरद पवार यांनी जुन्या, नव्या निष्ठावंतांचा मेळ घालत मोट बांधली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा मतदारसंघ नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिला आहे. साहेब म्हणतील तेच धोरण, याप्रमाणे आंबेगावातील समीकरणे त्यांनी जुळवली आहे. ३९ गावांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज शरद पवारांसोबत आहे. त्यामुळे शरद पवार यांची रणनीती महायुतीवर मात करण्यापूर्वीच महायुतीकडून मतदारसंघातील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूरचे आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या गटात आहेत. सध्या त्यांचा प्रतिकूल काळ असताना त्यांनी साथ सोडली नाही. तसेच ते जाहीरपणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करत असल्याने शिरूरचा गड महायुतीसाठी अडसर ठरला आहे. त्यात अमोल कोल्हे यांची क्रेझ संपूर्ण राज्यासह मतदारसंघात आहे. ही क्रेझ भेदणे महायुतीला आव्हानात्मक आहे. त्यादृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी बेरजेच्या राजकारणात एका प्रस्थापित नेत्याला बोलावले होते.
दोन दिग्गजांची मनधरणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, झेडपीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांची मनधरणी करण्यात आल्याचे समजते. यात बांदल यांची ताकद तीन झेडपी गटापर्यंत आहे. गतवेळी त्यांनी डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार करीत त्यांना मताधिक्य मिळवून दिले होते. यावेळी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्याचबरोबर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचा गट सक्रिय करण्यासाठी फडणवीस यांनी कंबर कसली आहे. या दोन नेत्यांकडून सुमारे एक लाख मतांचा गठ्ठा आहे. यावर महायुतीची भिस्त आहे.
सहानुभूतीच्या लाटेवर मतदार स्वार होणार?
शिरूर लोकसभा मतदारसंघातील दोन प्रस्थापितांचे मन परिवर्तन केले जात आहे. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर आणि शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याविषयी जनतेच्या सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही नेत्यांची टक्केवारी एकूण २५ टक्क्यांवर जात आहे. नेते महायुतीच्या गळाला लागले तरी सर्वसामान्य मतदार हा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होणार काय, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे कागदावरची बेरीज महायुतीच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा आहे.