पुणे – कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा हा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर, दुसरा टप्पा हा १ फेब्रुवारी ते दि. ३१ मार्च २०२४ असा असणार आहे.
काही कारणास्तव पहिल्या टप्प्यामध्ये सवलत घेण्यासाठी अर्ज करण्यास विलंब झाला तर, दुसऱ्या टप्यामध्येदेखील सवलतीसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. परंतू अशा प्रकरणात लाभाचे प्रमाण कमी राहील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या सालामध्ये निष्पादित केलेल्या दस्तांमध्ये कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा दस्तांवरील कमी भरलेले संपूर्ण मुद्रांक शुल्क माफ करण्यात येऊन व त्यावरील दंडाची रक्कम देखील संपूर्णपणे माफ करण्यात आली आहे.
तर, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्काची रक्कम ही १ लाखापेक्षा जास्त असलेल्या प्रकरणात कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सूट देऊन त्यावरील दंडाची संपूर्ण रक्कम माफ करण्यात आली आहे. १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये निष्पादित केलेल्या दस्तांच्या बाबतीत कमी भरलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये २५ टक्क्यांपर्यंत सूट आणि दंड हा नाममात्र २५ लाख ते १ कोटी रुपये मर्यादेपर्यंतच वसूल करण्यात येणार आहे. दंडाची रक्क्म त्यापेक्षा जास्त असल्यास ती संपूर्णपणे माफ केली जाणार आहे.
अडचण आल्यास काॅल करा
अभय योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत नागरिकांना कोणतीही अडचण असल्यास त्यांनी मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाचा कॉल सेंटर क्र. ८८८८००७७७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.