टाकळीभान – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या बदलीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांनी दिले.
येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारी होत असूनही त्यांना कामकाजात सुधारणा करण्याची संधी देण्यात आली मात्र त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले होते. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांना निमं.ित्रत करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. देशमुख अवाक् झाल्या.
यावेळी सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, सदस्या अर्चना पवार, सुनील बोडखे, आबासाहेब रणनवरे, भाऊसाहेब पवार, प्रा. जयकर मगर, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, शिवाजी पवार, भाऊसाहेब पटारे, ग्रामविकास अधिकारी आर. एफ. जाधव यावेळी उपस्थित होते.
येथील आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांना कोणतीही सुविधा मिळत नाही. कर्मचारी आरोग्य केंद्रात उपस्थित नसतात, त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते, उपचार मिळत नाहीत. परिसर अंर्तरबाह्य अस्वच्छ असल्याने दुर्गंधी येते. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी गेल्या दोन वर्षांपासून येत होत्या. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांना आरोग्य विभागाने व ग्रामस्थांनी वेळोवेळी सूचना देऊनही कामकाजात सुधारणा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले होते.
ग्रामस्थांनी मांडलेल्या संतप्त प्रतिक्रिया डाॅ. देशमुख यांनी ऐकून घेतल्यावर देशमुख म्हणाल्या की, गेली दोन वर्षे येथील वैद्यकीय अधिकारी यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. मात्र, त्यांना कामकाजातील संपूर्ण माहिती नसल्याने ते कामकाज करण्यात सातत्याने अपुरे पडतात. त्यामुळे रुग्णांच्या सुविधेबाबत अडचणी येत आहेत. अनेक वेळा संधी देवूनही त्यांच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या थेट बदलीचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. राजश्री देशमुख यांनी दिले.
आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत तक्रारीचे वृत्त प्रसिध्द होताच आ. लहु कानडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन अधिकारी व कर्मचार्यांची कानउघडणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नागरगोजे यांच्याशी चर्चा केली होती. त्याचदिवशी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नागरगोजे यांनी सायंकाळी भेट देऊन पाहणी करून कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही कामकाजातील सुधारणा झाली नाही.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सुविधा मिळत नाही. ग्रामपंचायत वेळोवेळी मदत करीत असली तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे दुर्लक्षामुळे रुग्णसेवा मिळत नाही. रुग्णसेवा देण्यास वैद्यकीय अधिकारी असमर्थ ठरत आहेत. वरिष्ठांचे आदेशही पाळले जात नाही. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बदलीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावा. याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. लहू कानडे यांच्याकडे बदलीसाठी आग्रही भूमिका मांडली जाईल. तातडीने या वैद्यकीय अधिकारी यांची बदली करावी, अन्यथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांंच्या दालनात ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिला.