पुणे – मुद्रांक शुल्क न भरलेल्या अथवा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या प्रकरणात नागरिकांना दिलासा देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने अभय योजना आणली आहे. तिला चांगला प्रतिसाद मिळत असून, महिनाभरात 2 हजार 986 प्रकरणांमधून 11 कोटी 11 लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
अभय योजनेतंर्गत १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीसाठी एक टप्पा आणि १ जानेवारी २००१ ते २०२० या कालावधीतील दस्तांसाठी दुसरा टप्पा असे दोन टप्पे तयार करण्यात आले आहेत. दि. ३१ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी 2024 ते ३१ मार्च २०२४ अशा 2 टप्प्यांत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत राज्य सरकारकडून सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे.
राज्यातील 43 मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात महिनाभरात 6 हजार 661 प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील उर्वरित 3 हजार 675 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती नोंदणी विभागाकडून देण्यात आली.
पुणे विभागातील स्थिती
जिल्हा- निर्गत प्रकरणे – वसूल रक्कम (रु.)
पुणे शहर – 239 – 1 कोटी 63 लाख
पुणे ग्रामीण – 93 – 44 लाख
सातारा- 25 – 7 लाख 35हजार
सांगली – 28 – 3 लाख 59 हजार
कोल्हापूर – 128 – 79 लाख 15 हजार
सोलापूर – 107 – 13 लाख 58 हजार
योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया
मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत दस्त हा कोणत्याही रक्कमेच्या स्टॅम्प पेपरवर निष्पादित झालेला असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला अर्ज करता येणार नाही. संबंधित पक्षकारांना त्यांनी लेखी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत डिमांड नोटीस देण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना नोंदणी महानिरीक्षकांनी दिल्या आहेत. एखाद्या प्रकरणी पूर्वीच डिमांड नोटीस देण्यात आली असेल, तर, त्याप्रकरणी नव्याने मुद्रांक शुल्काचे निर्धारण करण्याची गरज नाही. अशा प्रकरणी सवलत तातडीने लागू करुन तात्काळ डिमांड नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.