सत्रपूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 88 हजार 332 हजार विद्यार्थ्यांना केवळ सत्रपूर्तता संपल्यामुळे परीक्षेसाठी अर्ज करता आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. परंतु, या सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून पुन्हा परीक्षांना बसण्याची संधी देण्याचा निर्णय घेत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राची परीक्षा 21 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. परंतु, सत्रपूर्तता संपल्यामुळे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्जच स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भिती या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती. आम्हालाही परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी द्यावी, अशी मागणी संबंधित विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यामुळे पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता.
सत्रपूर्तता म्हणजे काय?
तीन वर्षाच्या पदवीला प्रवेश घेतल्यानंतर सहा वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदवी या दोन वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर पाच वर्षात शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. या कालावधीत विद्यार्थ्याने पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जात नाही, असा नियम आहे.
पुणे विद्यापीठाने दिली मुभा
सत्रपूर्तता संपल्यामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दोन अतिरिक्त परीक्षांना बसण्याची संधी देण्याच्या प्रस्तावास कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी मान्यता दिली. त्यानंतर पात्र सर्व विद्यार्थ्यांना अपवादात्मक स्थिती विचारात घेऊन यापुढे दोन परीक्षांना बसण्याची शेवटची संधी देण्यास मान्यता देत असल्याचे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
केवळ अंतिम व अंतिम पूर्व वर्षातील विद्यार्थ्यांनाच दोन परीक्षा देण्याची संधी असेल. 2012-13च्या पॅटर्न पासूनचे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरतील. नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे, त्यांचे परीक्षा अर्ज येत्या सोमवारपासून स्वीकारण्यात येतील.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन