पुणे –महापालिका हद्दीत समाविष्ट 23 गावांना पाण्यासोबतच आता पावसाळ्यात खराब रस्त्यांचाही सामना करावा लागणार आहे. महापालिकेकडून शहरात पावसाळापूर्व रस्ते दुरुस्तीसाठी 42 कोटी रुपयांच्या “रिसर्फेसिंग’ कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. तर पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते तातडीने दुरूस्त करण्यासाठी 15 दुरुस्ती व्हॅनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 कोटींच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे, एका बाजूला शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यापूर्व कामांसाठी तब्बल 60 ते 62 कोटींचा खर्च होणार असला तरी 23 गावांमधील नागरिकांच्या नशिबी मात्र खराब रस्त्यांचा वनवास असणार आहे.
शहरात गेल्या दीड वर्षांपासून सलग खोदाईची कामे सुरू आहेत. खासगी केबल खोदाईची कामे 1 मेपासून बंद करण्यात आली असली तरी दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या समान पाणी योजना तसेच सांडपाणी वाहिन्यांच्या कामाची खोदाई सुरूच आहे. तर या खोदाईनंतर महापालिकेने केलेली रस्त्यांची डागडुजी तकलादू निघाल्याने महापालिकेस पावसाळ्यापूर्वी अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी पथ विभागाकडून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून खराब होऊ शकणाऱ्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात काही रस्ते पूर्ण तर काही ठराविक भागांत दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने 42 कोटींच्या निविदा काढणार असल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. मात्र, ही कामे केवळ शहराच्या जुन्या हद्दीत केली जाणार असून 23 गावांमध्ये ती केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 7 जूनपूर्वी ही कामे पूर्ण केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.
23 गावांना फक्त एक मोबाइल व्हॅन
महापालिकेकडून पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे दुरूस्त करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालय स्तरावर 15 मोबाइल व्हॅनची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, 23 गावांसाठीही एक व्हॅन असणार असून या कामासाठी सुमारे 20 कोटींच्या निविदा प्रशासनाने काढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना तक्रारीनुसार, तसेच पावसाळ्यात प्रशासनाकडून रस्त्यांच्या पाहणीत ज्या रस्त्यांवर खड्डे असतील त्या ठिकाणी या व्हॅनच्या माध्यमातून दुरुस्ती केली जाणार आहे.
अंदाजपत्रकीय निधीतून गावांसाठी खर्च
नवीन 23 गावांमधील रस्त्यांसाठी पालिकेच्या 2022-23 च्या अंदाजपत्रकात प्रत्येकी 1 ते दीड कोटींचा खर्च प्रस्तावित केला आहे. या खर्चातून या गावांमधील रस्ते विकसित केले जाणार आहेत. मात्र, ही कामे वर्षभर होणार आहेत. त्यामुळे, तूर्तास पावसाळ्यात नवीन रस्ते न झाल्यास आहे त्यांच्या रस्त्यांवरच या गावांमधील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पावसाळा काढावा लागणार आहे.स्पष्टीकरण मागविले आहे.