वाई -ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी व पुरामुळे वाई तालुक्याच्या पूर्व- पश्चिम भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची घरे, शेती, विहिरी, जनावरे, खरीप व बागायती पिकांबरोबर सार्वजनिक मालमत्तेचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बाधितांचे पंचनामे प्रस्ताव तातडीने तयार करून महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीतजास्त शासकीय मदत पोहचवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
परतीच्या पावसादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या वाई तालुक्यातील गावांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. संगीता चव्हाण, उपसभापती पै. विक्रांत डोंगरे, प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापुरकर, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्याचा नुकसानीचा आढावा सादर केला. अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसान तसेच पंचनाम्यांच्या सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या घरांचे, विहिरीचे, शेतजमिनीचे, जनावरांचे पंचनामे करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करावेत.
पाण्यात वाहून गेलेले पूल किंवा खराब झालेल्या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू करावी व त्यांचे नवीन प्रस्ताव शासनाकडे त्वरीत पाठवावेत, असे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. वाईच्या पश्चिम भागातील एसटी बस सेवा सुरू करून दुर्गम भागातील लोकांची गैरसोय दूर करण्याची सूचना त्यांनी आगारप्रमुखाना दिली. बांधकाम विभाग, महावितरण, एसटी महामंडळ, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागाचा आढावा सादर केला.
करोनासंदर्भात तालुक्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा डॉ. संदीप यादव यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीपाद जाधव, पंचायत समिती बांधकाम अभियंता एस. टी. जाधव, महावितरणचे अभियंता अविनाश खुस्पे, वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, आगारप्रमुख गणेश कोळी, डॉ. रमेश शेंडगे, नगरपालिकेचे अधिकारी नारायण गोसावी, गटशिक्षण अधिकारी सुधीर महामुनी, माजी उपसभापती अनिल जगताप तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता मस्कर, सौ. रंजना डगळे, प्रकाश चव्हाण व पंचायत समितीचे पदाधिकारी, प्रशासकीय सर्व विभागाचे अधिकारी, सर्कल अधिकारी, तलाठी, कृषी कर्मचारी उपस्थित होते.
पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करणार
वाई तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांतील पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करणार असल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर व तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले. भुईंज, पाचवड, वाई, पसरणी, धोम या गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून या गावांमधील हळद, आले, सोयाबीन, घेवडा, भुईमूग, स्ट्रॉबेरी या पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वाईच्या पश्चिम भागात तीन हजार 800 हेक्टरवर भात शेती असून तीन हजार हेक्टर जमिनीत सोयाबीन आहे. तालुक्यात सर्वात जास्त नुकसान सोयाबीन व भात शेतीचे झाल्याचे तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी सांगितले.