मुंबई – महाराष्ट्रात यापुढे कुठल्या तपासासाठी सीबीआय विनापरवानगी एन्ट्री करू शकणार नाही. त्यासंदर्भात देण्यात आलेली सामान्य संमती राज्य सरकारने बुधवारी मागे घेतली. त्या पाऊलामुळे महाराष्ट्रात तपास करायचा असल्यास सीबीआयला राज्य सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
मागील काही काळात केंद्रीय आणि काही राज्यांच्या यंत्रणांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरोधात विविध यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगाल आणि राजस्थान यांसारख्या राज्यांनी सीबीआयला विनापरवानगी तपास करण्यास मनाई केली.
आता तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून मोठेच राजकीय वादळ निर्माण झाले. त्या प्रकरणाचा तपास नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला.
अलिकडेच चव्हाट्यावर आलेल्या टीआरपी फेरफार प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने सीबीआयविषयीचा निर्णय घेतला आहे.