राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांचे प्रतिपादन
पुणे – पूर्वांचल म्हणजेच नॉर्थ ईस्ट हा भारत, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार या चार देशांच्या सीमेवर वसलेला प्रदेश आहे. या भागाच्या माध्यमातून बांगलादेशमधील धर्मांध संघटनांचे विभाजनवादी कार्यकर्ते भारतात सर्रासपणे घुसतात, अशा नागरिकांवर रोख लावण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायदा हा महत्वाचा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे यांनी अधोरेखित केले.
ईश्वरपूरम संस्थेतर्फे आयोजित क्नो युवर नॉर्थईस्ट या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी झाला. यावेळी देशपांडे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, सुदर्शन केमिकल्सचे वसंत राठी, संस्थेच्या प्रकल्प समितीचे अध्यक्ष विनायक कानेटकर आणि संस्थेचे विनीत कुबेर उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, सेव्हन सिस्टर या नावाने ओळखला जाणारा पूर्वांचल प्रदेश हा आसाम, नागालॅन्ड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या सात राज्यांचा प्रदेश आहे. याठिकाणी 160 प्रमुख जनजाती आहेत तर लहान 400 जाती आहेत. सुमारे 200 वर प्रकारच्या भाषा याठिकाणी बोलल्या जातात. मात्र, या प्रदेशात ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माच्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने स्थानिक नागरिकांवर त्यांचे वर्चस्व आहे.
यातील अनेक नागरिक हे भारताला मानत असले, तरी बांगलादेश मधील धर्मांध संघटनांच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडून विभाजनवादी मार्गावर जाणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील लक्षणीय आहे, अशातच या ठिकाणांहून थेट भारताच्या महानगरांमध्ये घुसण्यासाठी बांगलादेशमधील विभाजनवादी कार्यकर्त्यांना मोठी मदत मिळत असते. या सर्व गैरप्रकारांवर रोख लावणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकत्व आणि नागरिकत्व नोंदणी कायदा महत्त्वाचा आहे.
या कायद्यांच्या अंमलबजावणीला आज मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. कारण, यामुळे बांगलादेशी घुसखोरांचे मार्ग बंद होणार आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांनीही ही परिस्थिती समजून घेत, या कायद्यांचे समर्थ करावे तसेच पूर्वांचल समजून घेत त्यांच्यासोबत भावनिक संबंध जोपासावेत, असे आवाहनही देशपांडे यांनी यावेळी केले.