– हेमंत महाजन
गेले तीन आठवडे मी पश्चिम बंगाल किनारपट्टीचा दौरा केला. तेथील सुरक्षा दलाच्या अनेक कर्मचार्यांशी बोललो. त्यातून किनारपट्टीला असलेले अनेक धोके समोर आले, त्याबाबत…
पश्चिम बंगालमध्ये वेगळ्या ऑपरेशनमध्ये, सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) 45 जणांना बेकायदेशीरपणे आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली. अटक केलेल्यांमध्ये 32 बांगलादेशी आहेत ज्यांनी सीमा ओलांडून भारतात जाण्याचा प्रयत्न केला आणि 13 भारतीय (भारतीय बांगलादेशी) आहेत ज्यांनी बेकायदेशीरपणे बांगलादेशात जाण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान, बांगलादेशी नागरिकांनी ते चांगले जीवन जगण्यासाठी भारतात येत असल्याचे उघड केले आणि अटक केलेल्या भारतीयांनी सांगितले की ते त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बांगलादेशला जात होते, म्हणजेच ‘आओ जाओ घर तुम्हारा.’
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर शस्त्रास्त्रांची, दारूगोळ्याची तस्करी, घुसखोरी आणि इतर गुन्हेगारीमुळे किनार्यालगतचे महत्त्वाचे उद्योग वा संरक्षण आस्थापनांना, सीमापारच्या अवैध हालचालींपासूनचा धोका आहे.पूर्व मिदनापूर, दक्षिण 24-परगणा आणि उत्तर 24-परगणा, शेजारी देशास नद्यांनी व बंगालच्या उपसागराने जोडल्या गेलेल्या तीन जिल्ह्यांना मिळून 156 किमीहून अधिक किनारपट्टी लाभलेली आहे. ती केवळ 7 पोलीस स्थानकांना सांभाळायची आहे. ती स्थानके कुठलीही आणीबाणी हाताळण्यास समर्थ
बांगलादेशलगतचा सुंदरबन भाग
भारत आणि बांगलादेश यादरम्यान 180 किमी सीमा पश्चिम बंगालमधील नदीचीच आहे. किनारपट्टीच्या सुरक्षेकरता, पश्चिम बंगालने 13 निगराणी जलदगती नौका खरेदी केलेल्या आहेत. राज्यात निरनिराळी 7 पोलीस स्थानके आहेत. जमिनीवरून आणि समुद्रमार्गे आलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी राज्य भरून गेलेले आहे.असंख्य खाड्या, छोटी आखाते, छोट्या नद्या ही पश्चिम बंगालची वैशिष्ट्ये आहेत.खाड्यांच्या सुरक्षा आणि देखरेखीकरता सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेच्या 1 बटालियन्स, सहा तरत्या सीमा चौक्यांसह (बीओपी- बॉर्डर आउटपोस्टस) तैनात केलेल्या आहेत. यापैकी चार आघाडीवर तैनात आहेत, तर दोन आरक्षित ठेवलेल्या आहेत. या सीमाचौकी गस्तीनौकांच्या मदतीने संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवतात. मात्र ही साधने अपुरी आहेत.
सर्व खाड्या लहान नाल्यांनी जोडल्या असतात. उथळ आणि खोल खाड्या असल्यामुळे या मार्गांचा वापर करून भारतीय सीमेच्या आत-बाहेर, ये-जा करणार्या घुसखोर, तस्कर आणि दहशतवादी इत्यादींना सोपे जाते. ओहोटीच्या काळात तयार होणारी बेटे आणि वालुकादंड यांवरील खारफूट त्यांना आसरा देते. अनेक बांगलादेशी घुसखोर; शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके घेऊन येताना; भारतीय सुरक्षा दलांकडून या भागांत पकडले गेले आहेत.
सुंदरबनात हल्ल्याची भीती
11 नोव्हेंबर 2015 रोजी दोन बांगलादेशी नौका, भारतीय पाण्यातील सुंदरबनात शिरल्या. गस्त घालणार्या कोस्ट गार्ड नौकेने, बांगलादेशाच्या बंगदुनी बेटापासून काही नॉटिकल मैलांवर त्या नौका पकडल्या. सुंदरबनातील जलमार्गांचे जाळे अतिशय धोकादायक आहे, राष्ट्रविरोधी कार्यवाहीस अनुकूल आहे. त्यातून दहशतवादी आणि शस्त्रास्त्रे सहजपणे देशाच्या मुख्य भूमीतून इतर भागांत जाऊ शकतात. सुरक्षा दलांनी, भारत-बांगलादेश भूमीअंतर्गत जलमार्ग आणि व्यापाराबाबतच्या संकेत-संचानुसार सुंदरबनातून येणार्या बांगलादेशी तराफ्यांवर अधिक देखरेख करणे आवश्यक आहे. बोटींची तपासणी न करता सुंदरबनातून जाऊ दिले जाऊ नये. कारण त्यामुळे, दोन्ही शेजारी देशांतील मैत्रीचा, सुरक्षा दलांना चकवण्यासाठी गुन्हेगार गैरफायदा घेण्याचा धोका असतो.
भारताचे किनारे भूसंरचनेच्या वैविध्याने नटलेले आहेत, जसे की; खाड्या, छोटी आखाते, पाणवठे, छोट्या नद्या, उथळ तलाव, नदीमुखे, दलदली, खारजमिनी, तसेच टेकड्या, खडकाळ कडे, दांडे, किनारे आणि बेटे (लोकवस्ती असलेली आणि नसलेली). पाणवठे आणि नदी प्रवाहक्षेत्रे किनार्यातून जमिनीत खोलवर शिरत असतात, त्यामुळे किनारा भूखंडात शिरलेला असतो. दुर्गम असल्याने हा भाग असुरक्षित किंवा अपुर्या सुरक्षेसह राहिली. अशी ठिकाणे, छुप्या रीतीने अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि तस्करीकृत सामान उतरवून घेण्याकरता, तसेच तस्कर व दहशतवाद्यांच्या घुसखोरीकरता अनुकूल ठरते. अवैध नौका सहजच इथे दाखल होऊ शकतात आणि गुपचूप नाहीशाही होऊ शकतात. त्यांना, भू-संरचनेच्या वैशिष्ट्यांचा लाभ घेता येतो. नद्यांची प्रवाहक्षेत्रे जी बहुतेकदा परस्परांशी जोडलेलीही असतात आणि भूखंडात खोलवर गेलेलीही असतात, त्यामुळे किनारपट्टी दहशतवादास, तस्करीस आणि शस्त्रास्त्रे व अंमलीपदार्थांच्या व्यापारात मदत करते. खारफुटीची जंगले, वालुकादंड आणि मनुष्यवस्ती नसलेली किनारपट्टी नजीकची बेटे घुसखोर, गुन्हेगार आणि अवैध धंदे करणार्यांकरता लपण्याची ठिकाणे ठरतात.
बांगलादेशींचा ओघ कमी होत नाही
कडक सुरक्षा आणि वारंवार जलमार्गांवरील तालमी कवायती होत असूनही, किनारी खेड्यांतील बांगलादेशीचा ओघ कमी होत नाही. सार्वजनिक सुरक्षेस यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी हल्ले आणि घुसखोरी होऊ नये म्हणून, सागरी सुरक्षा दल दरसाल संयुक्त कवायती करतात. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशींची संख्या सर्वाधिक 57 लाख असल्याचा अंदाज आहे. काही बांगलादेशी स्थलांतरित खोट्या नोटांचा प्रसार करत असताना पकडलेले होते. बांगलादेशी घुसखोर पारादीप, कुजांग आणि इर्सामा भागांमध्ये राजकीय आश्रयाने स्थायिक झालेले आहेत.त्यांचे अवैधरीत्या राहणे कायदेशीर केले गेलेले आहे. घुसखोरांना शिधावाटपपत्रे प्राप्त झालेली आहेत, मतदारपत्रे मिळालेली आहेत किंवा गरिबीरेषेखालील असल्याबाबतचे प्रमाणपत्रही लाभलेले आहे.
त्यांच्या आधारे ते सरकारी लाभ उपभोगत आहेत. ही पोलीस स्थानके म्हणजेच पश्चिम बंगालची सागरी सुरक्षा अत्यंत ढिसाळ आहे आणि देशाच्या सुरक्षेला एक मोठा धोका आहे. हा लेख लिहीत असतानाच एक बातमी पुढे आली की आता बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पश्चिम बंगाल किनारपट्टी करता एक नवीन बटालियन तैनात करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवत आहे. घुसखोरी, तस्करीपासून सुंदरबन सुरक्षित करण्यासाठी बीएसएफने 1,100 जवानांचा समावेश असलेली सागरी बटालियन, 40 ड्रोन आणि ऑल-टेरेन व्हेइकल्सचा एक स्न्वॉड्रन सुंदरबन सुरक्षित करण्यासाठी आखलेल्या योजनेचा भाग आहे. गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा आराखडा तयार केला जाईल. झोपी गेलेली सुरक्षा दले आता जागी झालेली आहेत. गृहमंत्रालयाने या प्रस्तावाला लगेच मंजुरी देऊन पश्चिम बंगालची किनारपट्टी सुरक्षित करावी.