हेमंत महाजन
ईशान्य भारतीय लोकांमध्ये जन्मजात लढण्याची वृत्ती असल्याने एक धोरण म्हणून त्यांना सैन्यात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले आहे. तसेच ईशान्य भारतातून विविध चांगले सैन्याधिकारी निर्माण झाले आहेत. त्यांच्या गुणांचा आपण अजून जास्त वापर केला पाहिजे.
2021 मध्ये ईशान्य भारतात 34 हिंसक घटना घडल्या. या घटनांमधील हिंसाचारात बळी पडलेल्यांचा आकडा पाहिला तर 21 सामान्य नागरिक, 8 सैनिक, 41 बंडखोर असे एकूण 70 आहेत. या आधी दरवर्षी हिंसाचारामुळे साडेसातशे ते एक हजार मृत्यू व्हायचे. गेल्या काही वर्षांपासून ईशान्य भारतातला हिंसाचार कमी होत आहे; परंतु पुन्हा हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण चीनला ईशान्य भारतात हिंसाचार वाढवून भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग कमी करायचा आहे.
मध्यंतरी उल्फा गटातल्या अनेक बंडखोरांनी भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यांची जागा घेण्याकरता आता नवीन युवकांना तयार केले जात आहे. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलॅंड यांनी भारत सरकारशी करार केला होता. दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याने ऑपरेशन सनराइज् केले होते.यामध्ये एनएससीएन (के) चे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले होते.
आजकाल वेगवेगळे गट आपले वेगवेगळे ट्रेनिंग कॅम्प तयार करायच्या ऐवजी एकत्र राहतात, कारण तसे करणे स्वस्तात पडते. ऑपरेशन सनराइज् नंतर मणिपूर मधले बंडखोर पळून दुसरीकडे लपायला गेले होते. आधी त्यांचे कॅम्प सीमेपासून सहा ते दहा किलोमीटरच्या आत असायचे. भारताने म्यानमारवर दबाव टाकल्यानंतर ईशान्य भारताच्या बंडखोरांची ट्रेनिंग कॅम्प बंद करण्यात आले होते.
आता ईशान्य भारतातले बंडखोर गट पुन्हा एकदा म्यानमारमध्ये स्वतःला पुनर्जीवित करत आहे, संघटित होत आहे. यामध्ये त्यांना म्यानमार सैन्याकडून मदत मिळत आहे. मुख्य कारण हे गट म्यानमार सैन्याला त्यांच्याविरुद्ध निदर्शने करणाऱ्या वेगवेगळ्या नागरिक गटांच्या विरुद्ध कारवाई करण्यात मदत करत आहे. आता नागालॅंड, मणिपूर मधले चार मोठे गट एमएसएनके, पीपल्स लिबरेशन आर्मी आणि इतर पुन्हा एकदा संघटित होत आहेत. आपापसात चांगले संबंध ठेवून एकत्रित कारवाई करण्याकरता ते आता सीमेजवळ पुन्हा एक मुख्यालय निर्माण करत आहेत.
महिनाभरात दोन मोठ्या घटना
ईशान्य भारतातली परिस्थिती वेगाने सुधारत होती, त्याला धक्का देण्याकरिता गेल्या महिनाभरात दोन मोठ्या घटना घडल्या. पहिल्या घटनेमध्ये 46 आसाम रायफलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर 4 सैनिकांचा घात केला गेला; परंतु बंडखोर गटांना दोष देण्याऐवजी त्रिपाठींनाच दिला जात होता की, तुम्ही या भागात तुमच्या पत्नीला का आणले होते.
दुसरी मोठी घटना घडली, त्यात 13 नागरिक सैन्याच्या फायरिंगमध्ये मारले गेले.
त्यानंतर आसाम रायफल्सच्या स्थानिक मुख्यालयाची जाळपोळ करण्यात आली. हे नागरिक कोनयाक जनजातीचे होते. यात कोनयाक व बर्मातले नागा बहुतांश आहेत व हे म्यानमारमधून ये-जा करीत असतात. जनसंख्या तीन लाखांवर आहे. एनएससीएन युन यांगचा विप्लवी गट या भागात सक्रिय आहे.
एनएससीएन (आयएम) मुख्य प्रभावशाली गट तसेच एनएससीएन(के), एनएससीएन (के-20) ए, एनएससीएन (निकी, सुमी) गट, एनएससीएन (एनके), एनएससीएन (केया), एनएससीएन (केएन) अशा सर्वप्रकारच्या बंडखोर संघटना आहेत. म्यानमारमध्ये लष्करी शासन (चीन समर्थित) आल्याने चीनची या संघटनांना मदत आहे. येणाऱ्या काळामध्ये वाढू शकणाऱ्या कारवाईला तोंड देण्याकरता आपण सज्ज झाले पाहिजे.
काय करावे?
म्यानमार सैन्य आणि भारतीय सैन्यामध्ये संबंध अतिशय चांगले आहेत. याचा वापर करून आपण म्यानमार सैन्याला भारतीय बंडखोर गटांना मदत देण्यापासून थांबवले पाहिजे. कुठल्याही हद्दीमध्ये चीनला ईशान्य भारतात ढवळाढवळ करण्यापासून थांबवले पाहिजे. म्यानमारशी आर्थिक संबंधसुद्धा मजबूत केले पाहिजे. कलादान प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित केला गेला पाहिजे. आसाम रायफल्स दल संपूर्णतः
भारतीय सैन्याचा भाग नाही. त्याचे प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाकडे आहे, तर प्रत्यक्ष कार्यनियोजन भारतीय लष्कराकडे. हे दुहेरी नेतृत्व संपुष्टात आणून सैन्याकडे सोपवले जावे. या घडीस गरज आहे ती ईशान्येतील जनतेला भरवसा आणि विश्वास देण्याची. भारत सरकार, राज्य सरकार आणि सगळ्यांना त्यासाठी तातडीने विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सर्वांत आधी गरज आहे ती परस्पर विश्वासाची. एखाद्या घटनेने तो डळमळीत होता कामा नये.
देशाच्या सीमांचे रक्षण करताना सुरक्षा दलांना अत्यंत खडतर स्थितीला तोंड द्यावे लागते. काही वेळेस गोष्टी त्यांच्याही प्राणावर बेततात. त्या क्षेत्रात सुरक्षा दलांना विशेषाधिकार आहेत, हे कोणाला माहीत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. देश आणि जवान यांच्या रक्षणासाठी विशेषाधिकार कायम राहणे महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकांत सुरक्षा दलांविषयी तेढ निर्माण होईल अशा घटना घडवून आणण्यासाठी कोणत्या शक्ती कार्यरत आहेत का, याचाही कसून शोध घ्यावाच लागेल.
आज म्यानमार सीमेवर मुख्य आव्हान आहे, अफू, गांजा, चरस, तस्करी, बेकायदेशीर व्यापार आणि दहशतवादी गट जे तिथल्या जनतेकडून खंडणी वसूल करतात. येणाऱ्या काळात पाकिस्तानची मदत घेऊन चीनकडून ईशान्य भारतात हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न अजून तीव्र केला जाईल. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता आपण सदैव तयार असले पाहिजे. या सगळ्या कठीण परिस्थितीत ईशान्य भारतीय जनता आणि इतर भारतीय यांच्यातील दुरावा कसा घालवायचा, हे भारतीयांसमोरील मोठे आव्हान आहे.