100 वर्षांतील तीव्र दुष्काळ
मद्रास, दि. 6 – तामीळनाडूमधील सुमारे 1 कोटी लोकांना अवर्षणाचा तडाखा बसला आहे. गेल्या 100 वर्षांत इतके तीव्र अवर्षण पडले नव्हते, असे अधिकृत गोटांतून समजते. विहिरींच्या व तलावांच्या पाण्यावर आणि पावसावर अवलंबून असलेली राज्यातील सुमारे 20 लक्ष हेक्टर जमीन ईशान्य मान्सून पावसाच्या अभावाने ओसाड पडली आहे. यामुळे धान्योत्पादक 2 कोटी टनांनी कमी होईल, असा अंदाज आहे. किनारी भागांत काही ठिकाणी उशिरा पडलेल्या पावसाने संपूर्ण नुकसान काही प्रमाणात वाचण्याची शक्यता आहे.
हिंदी महासागरात परकीयांचे तळ नकोच
नवी दिल्ली – हिंदी महासागर हा शांतता विभाग राहावा यावर भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी संयुक्त पत्रकात भर दिला आहे आणि या विभागात परकीयांनी लष्करी तळ उभारण्यास संपूर्ण विरोध प्रकट केला आहे. असे लष्करी तळ स्थापन झाल्यास बड्या शक्तीमधील स्पर्धा वाढून तणाव निर्माण होण्याचा धोका या पत्रकातून व्यक्त करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने केलेले ठराव अमलात आणण्यासाठी नवे प्रयत्न करावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
प्रामाणिकपणे बातम्या देण्यानेच पत्रकारांना प्रतिष्ठा प्राप्त होईल
पत्रकारदिनानिमित्त एस. एम. यांचे विचार
पुणे – वृत्तपत्र हे शिक्षणाचे साधन आहे. त्या दृष्टीनेच त्याचा उपयोग झाला पाहिजे. खोटी बातमी देणार नाही असे ठरवून व स्वतःशी प्रामाणिक राहून काम केल्यास पत्रकारांना प्रतिष्ठा प्राप्त होईल, असे स्पष्ट मत समाजवादी नेते एस. एम. जोशी यांनी आज येथे प्रकट केले. ते पुढे म्हणाले, वृत्तपत्रातील संपादकीयही वाचले जाते. समाजाची धारणा बनविण्यासाठी संपादकीयमधून सतत नवविचार मांडत राहिले पाहिजे.
हॉटेलमधील वेटरपेक्षा पत्रकाराला कमी वेतन! – खुशवंत सिंगांची टीका
मुंबई – सरकार वृत्तपत्रावर दडपण आणू शकते. कारण जाहिराती मंजूर करणे त्यांच्या हाती असते अर्थात देशात वृत्तपत्रावर बंधने नाहीत, भरपूर स्वातंत्र्य आहे. पत्रकाराला मिळणारे वेतन अत्यंत अपुरे असते. एखाद्या चहाच्या हॉटेलातील वेटरलाही कनिष्ठ उपसंपादकापेक्षा अधिक वेतन मिळते, असेही खुशवंत सिंग म्हणाले.