हेमंत महाजन
मराठा सैनिक अत्यंत काटक, चपळ, कुशल, तगडे आणि कुठल्याही कामगिरीसाठी सदैव तयार असलेले आणि शिस्तीचे भोक्ते असतात. म्हणूनच रणांगणावर त्यांच्या शौर्याला धार चढते. मराठा बटालियनची कर्तबगारी…
4 फेब्रुवारी 1670 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनानी तानाजी मालुसरे यांनी कोंडाणा किल्ल्यावरती कब्जा केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक उद्गार होते, “गड आला पण सिंह गेला.’ या ऐतिहासिक लढाई दिवशी मराठा रेजिमेंट ज्यांचे सैनिक महाराष्ट्रातले असतात, मराठा लाइट इन्फंट्रीचा वर्धापन दिवस साजरा करतात. 16 डिसेंबर 2022 च्या आर्मी डेच्या दिवशी एक मराठा बटालियनला युनिट सायटेशन, 4 मराठा बटालियन युनिट एप्रिशेसन देण्यात आले. एक मराठा बटालियनला नॉर्दन आर्मी कमांडरचे युनिट प्रिसिएशन देण्यात आले. 2021 मध्ये मराठा रेजिमेंटला 5 सेना मेडल आणि इतर अनेक शूरता पुरस्काराने गौरवण्यात आले.
एका मराठा बटालियनमध्ये 750 ते 800 सैनिक 35 ते 45 आणि 15 ते 20 ऑफिसर्स असतात. दर वर्षी पाच ते सहा हजार सैनिक आणि अधिकारी रिटायर होतात आणि एवढेच नवीन प्रत्येक वर्षी भरती केले जातात. आज महाराष्ट्रामध्ये रिटायर झालेल्या मराठा सैनिकांची संख्या दोन लाखांहून जास्त आहेत. मराठा रेजिमेंटमध्ये 21 इन्फंट्री बटालियन्स, चार राष्ट्रीय रायफल्स बटालियन्स, दोन स्पेशल फोर्सेस बटालियन आणि एक मेक इन्फंट्री बटालियन आहे.
मराठा लाइट इन्फंट्रीची युद्धगर्जना
मराठा लाइट इन्फंट्रीचे चिन्ह अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्या पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड जी खांद्यावर असते. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना आहे “श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.’
आपल्या देशातही स्वातंत्र्याच्या काळातच काश्मीर खोऱ्यातील घुसखोर टोळ्यांचा बंदोबस्त 1947 साली 3 मराठा छत्रीधारी सैनिकांच्या बटालियनने केला. त्यानंतर गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम,
1962 चीनचे युद्ध, 65 व 71 चे पाकबरोबरच्या युद्धात मराठा बटालियनच्या शौर्याच्या कामगिरीचे कौतुक झाले आहे. “मराठा लाइट इन्फंट्री’चे लिव्हिंग लीजंड म्हणजे माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग. गोवा मुक्तीसंग्रामावेळी आदेश मिळताच बेळगावमधील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे सैनिक बेळगाव, वेंगुर्लामागे गोव्यात गेले आणि त्यांनी पोर्तुगीजांना पराभूत करत माघारी जाण्यास भाग पाडले. तसाच पराक्रम त्यांनी दमण दीव येथेही गाजवला. 1962च्या युद्धात सिक्कीममध्ये मराठाची तुकडी आघाडीवर होती. मराठा लाइट इन्फंट्रीमधील 6 मराठा बटालियनची स्थापना 1 फेब्रुवारी 1962 रोजी आली. त्याच वर्षी या बटालियनला चीनबरोबरच्या युद्धात सहभागी होण्याचा बहुमान मिळाला.
ठक्कर विहार, साळुंके विहारचा इतिहास
1965 च्या युद्धात अमृतसर वाघा येथून आत प्रवेश करत पाकिस्तानी हद्दीतील बुर्ज ठाण्यावर कब्जा करणारी तुकडी मराठाची होती. पुण्यात ज्यांच्या नावाने साळुंके विहार हा परिसर ओळखला जातो, त्या पांडुरंग साळुंके यांना याच लढाईसाठी महावीरचक्र मिळाले होते. स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारने पराक्रमासाठी “अशोकचक्र’ देण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले अशोकचक्र 2 मराठा बटालियनचे कॅप्टन एरिक ठक्कर यांनी मिळवले. हडपसरमधील लष्करी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचा परिसर असलेला ठक्कर विहार हा परिसर ज्यांच्या नावे ओळखला जातो, त्यांना मिझोराम नागालॅंडमध्ये बंडखोरांशी लढताना गाजवलेल्या पराक्रमासाठी अशोकचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
1971 च्या युद्धात तत्कालीन पूर्व पाकिस्तानात मराठा लाइटच्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने सर्वांना थक्क केले. मेजर नांबियार आणि लेफ्टनंट कर्नल ब्रार यांना ढाकाच्या लढाईसाठी वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील कर्नल संभाजी पाटील यांच्या 22 मराठाच्या तुकडीने असामान्य धैर्य दाखवत हिली प्रांत ताब्यात घेतला. त्याचवेळी लाहोरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील नैनाकोट हे पाकिस्तानातील अत्यंत मोक्याचे ठाणे मराठाच्याच तुकडीने आपल्या विलक्षण पराक्रमाच्या जोरावर ताब्यात घेतले. या लढाईसाठी पुण्यातील कर्नल सदानंद साळुंके यांना वीरचक्राने सन्मानित केले.
आफ्रिका खंडात, कांगो देशात
काश्मीर असो वा अरुणाचल, राजस्थान असो वा सियाचीन अशी एकही सीमा नाही, जिथे मराठाची तुकडी तैनात नाही. केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेर युद्ध करण्याची आणि ते जिंकण्याची परंपरा मराठा बटालियन्सनी आजही जिवंत ठेवली आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेतही मराठाची कामगिरी अत्यंत उजवी राहिली आहे. आपले सैनिक अशा ठिकाणी अन्य परकीय सैन्याच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतात, याची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली आहे. सात मराठा लाइट इन्फंट्री बटालियन सध्या आफ्रिका खंडात कांगो देशात शांती सेना म्हणून काम करत आहे.
भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्येही मराठा रेजिमेंटच्या सैनिकांचा समावेश आहे. सेकंड पॅराच्या तुकडीनेही उत्तम काम केले आहे. सर्जिकल स्ट्राइकसारख्या अत्यंत अभिमानास्पद कारवाईतही मराठाच्या सैनिकांचा समावेश होताच. कर्नल व्ही. बी. शिंदे यांनीच पहिली स्पेशल फोर्सेस बटालियन सुरू केली. 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर हेलिकॉप्टरमधून दोरीने खाली उतरून दहशतवाद्यांवर हल्ला चढविणारी पहिली व्यक्ती ही मराठाचेच कर्नल होते.
असा हा मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे. आपल्या पूर्वजांची ही कर्तबगारी आपल्याला माहिती हवी, आपण ती पुढच्या पिढीला सांगायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठाचे दैवत आहे. गनिमी कावा आणि युद्धकौशल्य यांच्या बळावरच मराठा लाइट इन्फंट्री आज देशाच्या सर्व सीमा सांभाळण्यात आघाडीवर आहे यापुढेही राहील.
मराठा रेजिमेंटचे स्फूर्तिगीत
मराठा रेजिमेंट स्फूर्तिगीताचे शब्द आहेत, आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांचे. या शब्दांना सुरांचा साज चढवला आहे बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांनी. मराठा रेजिमेंटमध्ये रोज म्हटले जाणारे स्फूर्तिगीत- मर्द आम्ही मराठे खरे, दुष्मनाला भरे कापरे। देश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।। वादळापरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो। मराठा कधी न संगरातुनी हटे, मारुनी दहास एक मराठा कटे । सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।1।। व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती । विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी। घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी, मृत्यू अम्हा पुढे घाबरे ।।2।। भारता आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो । राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा । ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे त्रिवार वंदन.