– माधव विद्वांस
यादवकालीन शिल्पशैलीचे अभ्यासक व्यासंगी लेखक, इतिहासाचे श्रेष्ठ अभ्यासक, आणि मराठी विश्वकोशाचे माजी विभाग संपादक भैय्यासाहेब देशपांडे तथा सुरेश रघुनाथ देशपांडे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 4 मे 1937 रोजी झाला.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कागल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले.
त्यांना इतिहास अभ्यासाचे बाळकडू त्यांचे आजोबा प्रसिद्ध इतिहासकार रावबहादूर डी. बी. पारसनीस यांचेकडून लहानपणीच मिळाले होते. इतिहास-राज्यशास्त्र, प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) घेतले होते.त्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथून पीएच.डी.संपादन केली.
त्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक,प्राध्यापक म्हणून नोकरी केली.त्यानंतर ते वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विश्वकोश कार्यालयात रुजू झाले.आणि वाई ही त्यांची कर्मभूमी झाली.लायन्सक्लबचे माध्यमातून वाई येथील अनेक सामाजिक संस्थांचा त्यांचा संबंध आला.गोरेपान, उंच, भैय्यासाहेब म्हणजे एक सदाबहार हसतमुख हजरजबाबी खिलाडू व्यक्तिमत्व होते.किंचित मान झुकवून खांद्यावर शबनम अडकवून चालणारे भैय्यासाहेब समोर आलेल्या व्यक्तीशी दोन शब्दतरी बोलत हे त्यांचे वैशिष्ट्य होते.सकाळी स्पोर्टड्रेस घालून लॉन टेनीस कोर्टवर वर हजर असायचे.
वाईमध्ये विविध विचारसरणीच्या लोकांचा त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.अगदी निवृत्तीनंतर त्यांनी छोटे दुकान टाकले होते.व्यापारापेक्षा मित्रपरिवार भेटण्याची एक जागाच झाली होती. शासकीय कर्मचार्यांचे संघटनेमार्फत त्यांनी संप आंदोलनांमध्ये नेतृत्वही केले.वाई एस.टी.स्थानकाजवळील विश्वकोश कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचे ते प्रवर्तक होते.अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.सेवानिवृत्तीनंतर ते विभाग संपादक, तसेच पुढे अखेरपर्यंत ज्येष्ठ अभ्यागत संपादक म्हणून कार्यरत होते.
मराठी विश्वकोशाचे आद्यसंपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून मे.पुं.रेगे, रा.ग.जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड, दिलीप करंबेळकर यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीपर्यंत त्यांनी सु. 54 वर्षे लेखन, संकलन व संपादनाचे काम सातत्याने केले.त्यांनी मराठी विश्वकोशाच्या प्रकाशित झालेल्या खंडांत सुमारे 900 हून अधिक नोंदींचे स्वतंत्र लेखन त्यांनी केले, तसेच अनेक नोंदींचे पुनर्लेखनही केले.साहित्य अकादमीच्या एनसायक्लोपिडिया ऑफ इंडियन लिटरेचरची सुधारित आवृत्ती तसेच महाराष्ट्र शिल्पकार कोश या मधील अनेक चरित्रे त्यांनी लिहिली आहेत.
गोमंतकातील पर्वरी येथील विश्वचरित्र संशोधन केंद्राच्या विद्यमाने प्रकाशित झालेल्या विश्वचरित्र कोशाच्या सहा खंडांत देशपांडे यांनी सु. 827 व्यक्तिचरित्रे लिहिली.भारतीय गणिका या ग्रंथामधून त्यांनी प्राचीन भारतीय समाजात असलेल्या गणिकांचे बद्दल बारकाईने प्रकाश टाकला आहे प्राचीन भारतीय व विदेशी रमणींविषयी थोडक्यात माहिती देऊन कलावंतीणीची तौलनिक माहिती दिली आहे.
मुंबईतील नॅब संस्थेकडून मराठेशाहीतील मनस्विनी या पुस्तकाचे ब्रेल लिपीत रूपांतर करण्यात आले.तसेच आकाशवाणीसह अनेक नियतकालिकांतून त्यांचे स्फूटलेखन प्रसिद्ध झाले होते. मराठेशाहीतील मनस्विनी या त्यांच्या ग्रंथातून मराठा इतिहासातील महिलांच्या कर्तृत्वाचे विवेचन केले आहे.तसेच राज्य चालविताना परचक्राच्या व गृहकलहामधून आलेल्या संकटांवर मात करून यशस्वी ठरलेल्या स्त्रियांची जीवनचरित्रे त्यांनी या ग्रंथात मांडली आहे.
कोशवाङ्मयाव्यतिरिक्त भैय्यासाहेबानी अनेक ग्रंथ लिहिले.यादव शिल्प ( ीलर्र्श्रीिींीीश) हा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून लिहिला व लंडन येथून प्रकाशित झाला.त्याच्या 6 आवृत्या निघाल्या.वर्ष 1989 मधे त्यांच्या भारतीय कामशिल्प या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळाला होता.मलाही भैय्यासाहेबांचा सहवास व मार्गदर्शन मिळाले.20 नोव्हेंबर 2018 रोजी पुणे येथे 81व्या वर्षी त्यांचे निधन झाले.