नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते आजपर्यंत कॉंग्रेसला आपल्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार मिळाला नाही. तसेच कॉंग्रेसने अध्यक्षपदासाठी बंद लिफाफ्यात नावेदेखील मागवली होती. त्यातच आता कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधीच योग्य उमेदवार असल्याचे मत कॉंग्रेसचे नेते शशि थरूर यांनी व्यक्त केले आहे.
कॉंग्रेसची सध्या जी स्थिती आहे ती सावरण्यासाठी तरुण नेतृत्वाची गरज आहे आणि प्रियंका गांधी ते नेतृत्व देऊ शकतात असे मत कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या वक्तव्याचेही त्यांनी समर्थन केले. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी तरुण नेत्याला संधी दिली पाहिजे असे सिंग यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. त्यामुळेही पक्षाचे मोठे नुकसान झाले असेही ते म्हणाले. या प्रश्नावर तातडीने निर्णय व्हायला पाहिजे होता असे सांगत सध्याच्या स्थितीत प्रियंका गांधीच कॉंग्रेसला योग्य मार्गदर्शन करू शकतात असेही थरूर यांनी म्हटले आहे.