धरणसाखळीतील पाणीसाठा 20 टीएमसीजवळ
पुणे – गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने खडकवासला धरण दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून मध्यरात्री 12 वाजेपासून 5136 क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, रविवारी या प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा 19.91 टीएमसी ( 68 टक्के) झाला आहे. यातील सर्वाधिक क्षमता असलेले वरसगाव धरणही 61 टक्के भरले असून पानशेत धरण 76 टक्के भरले आहे.
धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत, टेमघर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने तीन दिवसांत पाणीसाठा सुमारे चार टीएमसीने वाढला आहे. तर, रविवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान, या पावसाने गुरुवारी 50 टक्के पाणीसाठा असलेले खडकवासला धरण शनिवारी रात्री 11च्या सुमारास 100 टक्के भरल्याने रात्री 12 वाजेपासून धरणातून मुठा नदीत 5,136 क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यापूर्वी नदीकाठ परिसरात महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
पावसाची विश्रांती
या चारही धरणात रविवारी पावसाने विश्रांती घेतली. खडकवासला-4 , पानशेत-16, वरसगाव-7, तर टेमघर धरण क्षेत्रात 41 मिमी पाऊस झाला आहे. मात्र, आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने धरणात नाले, ओढे तसेच तसेच इतर जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.