Priyanka Gandhi – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या विरोधात राजस्थानच्या भाजप शाखेने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल प्रियंका यांच्यावर कारवाईची मागणी भाजपने (Bjp) केली आहे.
विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असणाऱ्या राजस्थानात शुक्रवारी प्रियंका यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. मोदी सरकार आणि भाजपचा फोकस केवळ सत्तेवर आहे.
त्यांना जनतेच्या कल्याणाशी देणे-घेणे नाही. भाजपचे नेते निवडणुकांवेळी विकासाच्या मुद्द्यांऐवजी धर्म आणि जातीवर बोलतात, असा आरोप प्रियंका यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर, राजस्थान भाजपने प्रियंका यांच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
धार्मिक भावनांच्या आधारे आचारसंहितेचा भंग करणे चिंताजनक आहे. पंतप्रधानांसंदर्भात खोटी वक्तव्ये केली जात आहेत, असे भाजपने तक्रारीत म्हटले.