नवी दिल्ली -महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कॉंग्रेसने आसाममध्ये मोठी जबाबदारी सोपवली आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने छाननी समिती स्थापन केली आहे. चव्हाण यांना त्या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
आसाममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची छाननी करेल. त्यानंतर उमेदवारांच्या नावांची शिफारस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे केली जाईल.
केंद्रीय समिती उमेदवार निवडीबाबत अंतिम निर्णय घेईल. चव्हाण यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने कॉंग्रेस श्रेष्ठींचा त्यांच्यावरील विश्वास कायम असल्याचे सूचित झाले आहे. असंतुष्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉंग्रेसच्या 23 नेत्यांच्या गटात चव्हाण यांचा समावेश आहे. त्या गटाने मागील वर्षी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये पक्षात व्यापक संघटनात्मक बदलांची आणि पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे कॉंग्रेसची कार्यपद्धती आणि नेतृत्वाबाबत पक्षांतर्गत अस्वस्थता असल्याचे चित्र निर्माण झाले.